शनिवार, ७ जानेवारी, २०१७

भाग नऊ

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस दुसरा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग नऊ*🌿🌿
             काही महिन्यांपूर्वी महाडजवळ सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याने खुप मोठा अपघात घडला होता आणि तो पूल इंग्रजांच्या काळातील होता म्हणे पण आता मी एक पूल पाहणार होतो तो पूल म्हणजे थेट शिवरायांनी बांधलेला आहे आणि तोही साडे तीनशे वर्षांपूर्वी!!!
     मागील भागात आपण पाहिले की पार गावापासून जवळ असलेल्या व दुधगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी जवळ हा पूल असून तो अगदी सुस्थितीत आहे नदीचे नाव लक्षात नाही पण 3 -4 कमानी असलेला पूल पहिला कि मन थक्क व्हायला लागते व त्यांच्या पश्चात हि शिवरायांची आठवण आल्याशिवाय राहत नाही पार गावातून परत येताना 1 किमी वर डावीकडे  प्रतापगडाकडे जाणारा रस्ता आहे आणि न वळता पुढे गेल्यावर समोरच एक मोठा पूल दिसतो पुलाजवळ एक मंदिर आहे  खळखळ वाहणारे पाणी आणि निरव शांतता होती निसर्गसौंदर्याने नटलेला ह्या भागात आपल्याला खुप करमते 
                  पुलाचे बांधकाम अगदी किल्ल्याच्या भिंतीसारखे आहे मोठमोठे चिरे वापरून केलेले हे बांधकाम आपल्याला थक्क करते आजही त्या पुलावरून वाहतूक सुरु आहे हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. नदीत उतरून पुलाचे निरीक्षण केले असता खूप आश्चर्य वाटत होते अगदी किल्ल्याच्या बांधकामासारखे बांधकाम केलेले आहे, मी परत फिरलो, परत फिरताना मात्र आपल्या पूर्वजांच्या बांधकाम शैलीतील प्रगतीचाच विचार करत होतो सतत!!
      उजवीकडे वळून 4 किमीच्या  नयनरम्य घाटातून प्रवास करून मी मुख्य रस्त्याला लागलो पोलादपूरकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर समोर एक 4किमी चा रस्ता आहे त्या रस्त्याने आपण प्रतापगडकडे जातो 
        एक किमी गेल्यावर समोरच एक ठिकाणी  मोठी गर्दी आपल्याला दिसते आणि तेथे कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठाप्रमाणे 400 वर्षापूर्वीचे खेडेगाव साकार होत आहे सध्या काम सुरू असून त्याचे 40 रु इतके तिकीट आहे पण ते जास्त वाटते त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी असणारी गावाची प्रतिकृती तयार करण्यात येत आहे म्हणून काम पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी आपण मागच्या काळात गेल्याचा अनुभव आपल्याला येणारच हे नक्कीच आता मात्र काम जोरात चालू आहे 
             येथे एक हस्तकला केंद्र आहे  त्या हस्तकला केंद्रात  अनेक पाहण्यासारख्या गोष्टी आहेत तसेच त्याठिकाणीच हस्तकला प्रदर्शन व विक्री केंद्र आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला महाबळेश्वरमधील सर्व प्रकारच्या वस्तू विकत घेता येतील तेही तिथल्या पेक्षा स्वस्तच !!
              अनेक लाकडी वस्तू,(अगदी किचनमधीलही) तसेच  खेळणी, पेनस्टॅण्ड, कीचेन, मेकअपच्या वस्तू चामड्याच्या वस्तूही आपल्याला मिळतात काही खरेदी करून मी मनातल्या मनात विचार करत  प्रतापगडाकडे निघालो होतो आणि मी माझ्या मनात ठरवले होते की आज आपण अफजलखानाची समाधी पहायची आता माझे मन इतिहासात शिरायला लागले होते आणि मला आठवले कि मी प्रतापगडावर 15 वर्षांपूर्वी आलो होतो तेंव्हा खानाच्या समाधीकडे जाता येत होते आणि तेथील स्वच्छताही किल्ल्यापेक्षाही जास्त होती आणि हि गोष्ट मला खूप खटकली होती पण पुढे मात्र अनेक घटना घडल्या आणि आज या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही तेथे पोलिसांचा पहारा आहे तिकडे जायचा विचार बदलून मी गडाकडे निघालो गाडी घेऊन आपण अगदी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणी जाऊ शकतो तेथे गाडी पार्क करून आपण अगदी कमी वेळेत गडावर जाऊ शकतो गड पाहण्यासाठी दीड दोन तास लागतात साधारणपणे, आता पाच वाजले होते मी गडाच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला तर तेथे दोन्ही बाजूला फळे सरबत ताक पुस्तके विकणारी दुकाने  उपलब्ध आहेत समोर टेहळणी बुरुज आहे थोडासा दूरवर व उंचावर 20-25मोठ्या पायऱ्या चढून गेल्यावर समोर दिसत होते जावळीचे खोरे अन निबिड अन घनदाट अरण्य !
      एका क्षणात माझ्या डोळ्यासोरून चौथीच्या पुस्तकात कितीदा तरी  वाचलेला,शिकलेला ,शिकवलेला, कितीतरी पुस्तकात कथा, कादंबऱ्यात वाचलेला,  ऐकलेला 'अफजलखानाचा वध ' हा प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकून गेला आणि त्या प्रसंगातील पात्रे माझ्यासभोवती फेर धरून नाचू लागली 
बुरुजावर फडफडणाऱ्या जरीपटक्याला मुजरा करून मी मुलुख न्याहळत होतो नजर जाईल तेथपर्यंत जंगल अन डोंगर दऱ्या!  याच ठिकाणी अफजलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला होता अन संभाजी कावजीने त्याचे मुंडके कापून आणले होते 
    बुरुजावरून जावळीचे संपूर्ण खोरे दिसत होते आणि त्या खोऱ्यात अफजलखानासारखा सरदार महाराजांनी  खल्लास केला होता आणि त्याचे मुंडके राजगडावर मासाहेबांना दाखविण्यासाठी धाडले होते राजगडाच्या माचीवर त्याचे विधिवत दफन केले होते 
   मला वाचलेले आठवले " माँसाहेब खानाचे मुंडके पाहिल्यावर म्हणाल्या की हाच तो ज्याने स्वारीच्या पायात साखळदंड बांधले यानेच अनेक मंदिरांचा विध्वंस केला आणि शिवबाला मारायला आलेला तो हाच!" तरीही मासाहेबांनी त्याच्या मुंडीचे दफन करायला सांगितले कारण तो शत्रू असला तरी पराक्रमी सरदार होता आणि शत्रू मेला अन वैर संपले.
क्रमश:
 
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा