शनिवार, १ जून, २०२४

कोकण ट्रीप

दिनांक:-21मे 2024 बार्शी, वैराग, मोहोळ गोंदवले सातारा माचूतर लिंगमला पारशी पॉईंट चिकने साहेब भेट टेबल land mapro गार्डन मुक्काम माचुतार महाबळेश्वर 
दिनांक:-22 मे 2024 गणेश मंदीर, प्लेटो पॉईंट, केट्स पॉईंट, इको पॉईंट, एलिफंट हेड पॉईंट, निडल होल,ओल्ड महाबळेश्वर, पंचगंगा मंदीर, मझेरी, रॉक पॉईंट सावित्री पॉईंट ऑर्थर सीट पॉईंट प्रवास मुक्काम कपडे बुद्रुक 
दिनांक:-23 मे 2024 लाटवण मार्गे पालगड, दापोली आसूद केशव राज मंदीर, किसानभवण, तामस तीर्थ परशुराम भूमी, चामुंडा मंदीर दाभोळ, अंजनवेल गुहागर मुक्काम 

दिनांक:-24मे 2024 समुद्रस्नान वेळणेश्वर हेदवी, विजयगड, जयगड, मालगुंड, गणपती पुळे रत्नागिरी मुक्काम 
दिनांक:-25मे 2024 देवरूख सखरपा आंबा घाट जोतिबा महालक्ष्मी मंदीर मिरज सांगोला, मंगळवेढा, सोलापूर मुक्काम 
दिनांक:-26मे 2024 बार्शी 

धन्यवाद

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

कोकणातील मुक्काम

🙏
मित्रहो आपण *सेम-डे रिटर्न, एक अथवा दोन ओव्हर नाईट स्टे* अशा स्वरूपाच्या सहली, फॅमिली.... फ्रेंड्स.... गेट-टू-गेदर अशा स्वरूपातील एकमेकांना भेटण्याचे वार्षिक कार्यक्रम नियमित आयोजित करत असतो. अशा कार्यक्रमानिमित्त आपण आधीच पैसे कमवून बसलेल्या रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सना भेटी देऊन भरलेल्या झोळीत धन ओतत असतो. आपण थोडा आपला दृष्टिकोन बदलला आणि समृद्ध कोकणातील घरे आणि निसर्गाने नटलेला कोकण प्रत्यक्ष कोकणातील घरातच राहून अनुभवायचा ठरवल्यास आपल्याच कोकणी बांधवांच्या जोडीने उभं राहिल्याचा आनंद आपल्याला नक्कीच मिळेल. थोडस उत्पन्न कोकणातील घरातूनही वाढेल. कोकणात उद्योग नाहीत सांगत केंद्र कोकणात विनाशकारी रिफायनरी लादत आहे. त्यासाठी आपण कोकणी जनतेसोबत उभे राहिल्यास कोकणातील कातळशिल्प, खाड्या, नद्या, फेसळणारा समुद्र, डोंगर, किल्ले याच्या जोडीनेच आंबा, काजू, फणस, चिकू, विविध पक्षी, मासे समुद्रखालील अद्भुत सृष्टी यांचे रक्षण करू शकू. आपोआपच कोकण आर्थिकदृष्ट्या संपन्न तर होईलच. रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे आपल्या वृद्ध माता-पित्याना एकटे सोडून वळलेला कोकणातील तरुण आपल्या घराकडे गावाकडे परंतु शकेल. रिफायनरीचे संकटही टळेल. मग येताय न... कोकण वाचवायला.
*येवा कोकण आपलोच असा!.....*
सोबतच संजय यादवराव, संस्थापक. कोकण चेंबर ऑफ टुरिझम यांची संबंधित माहिती पुरविणारी पोस्ट सोबत शेअर करत आहे. आपल्या ग्रुपमधील कोणीही अथवा मित्रमंडळी पैकी कोणीही अशा प्रकारचा उपक्रम कोकणात राबवत असेल तर त्यालाही यामध्ये सोबत जोडून घेता येईल.

*जगदीश चौधरी, डोंबिवली...*
==============================

कोकणात काही वेगळा निसर्ग अनुभव घ्यायचा आहे का ? काही हटके जागा पाहायचे आहेत का ?

नेहमीची पर्यटन स्थळ सर्वांनाच माहिती आहेत,कोकणात या वर्षी काही वेगळं पाहायचं असेल, आणि कोकणातील नाविन्यपूर्ण ग्रामीण पर्यटनाचा, निसर्गाचा,संस्कृतीचा स्वर्गीय अनुभव घ्यायचा असेल तर काही अपरिचित हटके जागा.

*१ प्रभाकर सावे. तारपा  कृषी पर्यटन...*
घोलवड डहाणू मुंबईवरून तीन तास
आदिवासी पर्यटन, शेती पर्यटन ,चिकू पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन.( आधुनिक पर्यटन )
संपर्क  9822078153 

*सगुणा बाग नेरळ कर्जत...*
आमचा युवा मित्र चंदन भडसावळे
यांनी नव्या स्वरूपात सगुणा बागेत विकसित केलेले ग्रामीण पर्यटन, ग्रामीण पर्यटनाच्या असंख्य सुविधा आणि असामान्य अनुभव. निसर्ग वेड्या पर्यटकांसाठी यासमोर इमॅजिका सुद्धा काही नाही.
संपर्क. 9869552808

*२. ओम प्रकाश कोळथरकर हरिहरेश्वर...*
बागेत राहण्याची व्यवस्था, अगस्ती ऋषी गुहा परिक्रमा,  सिंधू सागराचा समुद्र परिक्रमेचा सामान्य अनुभव. शक्य आहे का ? फोनवर कन्फर्म करा.
संपर्क. +91 93592 26963

*३ मास्तर फार्म - खेड, महाळुंगे प्राध्यापक सतीश कदम...*
गावात जाऊन राहणे, नदीवर पोहणे सह्याद्री मधील भटकंती, गावातील मुलांचे संस्कृती कार्यक्रम, ग्रामीण पर्यटनाचा एक असामान्य अनुभव.
ग्रामदेवता, रसाळगड ऐतिहासिक पर्यटन.  संपर्क. 9892769116

*४. सतीश कामत आरवली संगमेश्वर...*
नैसर्गिक गरम पाण्याचा स्विमिंग पूल
किंबहुना जगात कुठे नसेल, ग्रामीण पर्यटनाचा समृद्ध अनुभव. संपूर्ण पर्यटनाचा नियोजन गावातली माणसे एकत्र करतात.
संपर्क. 9860837397

*संदेश संसारे. 9890816469 चिपळूण...*
वाशिष्ठी बॅकवॉटर टुरिझम आणि क्रोकोडाइल टुरिझम.
कोकणातील बॅकवॉटर चा गावात जाऊन राहण्याचा एक समृद्ध अनुभव, तुम्ही नशीबवान असाल तर क्रोकोडाइल जवळून पाहता येतील फोटो घेता येतील आणि या वाइल्ड क्रोकोडाइल आहेत

*सत्यवान दरदेकर +91 94046 52265. /. +91 98813 83228*
कोकणातील पहिली हाऊसबोट,
गाव परचुरी तालुका गुहागर आणि गावात जाऊन राहण्याचा समृद्ध ग्रामीण पर्यटन अनुभव. अर्थात बरेच ऍडव्हान्स बुकिंग होत असल्याने हाऊस बोट चे बुकिंग मिळणं कठीण आहे. पण सत्यवान च्या घरामध्ये जाऊन राहता येईल आणि ग्रामीण पर्यटनाचा आणि क्रोकोडाइल टुरिझमचा अनुभव घेता येईल.

*५. माचाळ ग्रामीण पर्यटन प्राध्यापक विजय हटकर...*
शून्य व्यवस्था आहेत, ज्या गावात दोन वर्षापर्यंत जायला रस्ता नव्हता असं हिल स्टेशनचं गाव येथे जाऊन शेतकऱ्यांच्या घरामध्ये आपला राहू शकता. शहरातल्या व्यवस्था मिळणार नाहीत पण असामान्य पर्यटन अनुभव मिळेल. मुचकुंदी ऋषींची गुहा, इथली देवराई सर्वच असामान्य आहे.
संपर्क. +91 88066 35017

*पितांबरी इको व्हिलेज, श्रीहरी कवचे गाव तळवडे, राजापूर...*
आधुनिक सोयी असलेले पण पर्यटनाचे गाव, शेकडो प्रकारची झाडे गोशाळा, एक समृद्ध ग्रामीण पर्यटनाचा अनुभव. इथे राहुन माचाळ पर्यटन करता येणे शक्य आहे. कोकणातील उसाची शेती गुऱ्हाळ बांबू पार्क अशा अनेक आधुनिक गोष्टी सुद्धा पाहता येतील
संपर्क   +91 94057 52787

*गणेश रानडे नाटे राजापूर...*
प्रचंड मोठी आंब्याची बाग आणि आंब्याच्या बागेमध्ये राहण्याचा समृद्ध निसर्ग अनुभव.
9422433676

*हडी आयलँड मालवण,महेश मांजरेकर...*
हे एक आयलँड आहे, खूपच सुंदर निसर्ग आहे, या आयलँड वर जाऊन राहता येतं, कालावलच्या खाडीमध्ये फिरणं, व अतिशय समृद्ध आयलँड वरच्या गावात राहणार लाईफ टाईम एक्सपिरीयन्स राहील.
संपर्क. +91 94043 96144

*भैय्या सामंत परुळे वेंगुर्ला, माचली पर्यटन केंद्र...*
श्वास चित्रपटात थोड्यावेळा करता जो निसर्ग दाखवलाय तो या गावातला. तो प्रत्यक्ष जगायचा असेल तर भैय्या सामंत यांच्या आधुनिक पण बागेतल्या पर्यटन केंद्रावर जाऊन राहिले पाहिजे.
9423879865

*काका भिसे, आंबोली...*
एक निसर्ग वेडा तरुण, काका बरोबर आंबोलीचा जंगल पाहिलं पाहिजे, आणि राहायची व्यवस्था होत असेल तर दहा किलोमीटर बाजूला चौकुळ या गावात जाऊन शेतकऱ्यांच्या घरामध्ये राहिले पाहिजे. सह्याद्रीतील जैवविविधता आणि जगातील समृद्ध सगळ्यात समृद्ध जंगलाचा आणि ग्रामीण पर्यटनाचा अनुभव.
संपर्क 09423512767

वेस्टर्न स्टाईल कमोड, ब्रेकफास्ट चहा, हॉटेल सारखे राहण आणि सर्विस, *शहरी संकल्पना असणाऱ्या पर्यटकांनी कृपया इथे जाऊ नये. भ्रमनिरास होईल.*

पण ज्यांना मुलांना आजोळी न्यायचा आहे, कोकणातील खरा निसर्गाचा आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यासाठी थोडी गैरसोय सहन करायची तयारी हे त्यांनी नक्की जा. यावर्षी नियोजन करा.

*टीप यातील अनेक जण यावर्षीच्या ग्लोबल कोकण महोत्सव 2024 मध्ये डोंबिवलीला तुम्हाला भेटतील. त्यांच्याशी थेट चर्चाही करता येईल.*

*संजय यादवराव....*
संस्थापक. कोकण चेंबर ऑफ टुरिझम, एग्रीकल्चर अँड फिशरीज
कोकण बिझनेस क्लब, कोकण पर्यटन उद्योग संघ

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

*चारधाम पदभ्रमण यात्रा...*

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - ५*


गंगोत्रीला दुपारी बारा वाजता पोहोचलो. मला गोमुख आणि तपोवन हा ट्रेक करायचा होता. गोमुख हे गंगेचे उगमस्थान आहे, तर 
तपोवनला शिवलिंग शिखर, त्यांच्या पायथ्याशी मोठे पठार व ग्लेशियर आहे. त्याच्यासाठी परमिट ( परवाना) घेणे आवश्यक होते. ऑनलाइन परवानगीचा मार्ग अवलंबला असता असे लक्षात आले की, शासनाकडे अधिकृत नोंदणी असलेल्या  अशा ॲडव्हेंचर/ ट्रेकिंग कंपनीचे पत्र तुम्हाला त्या ऑनलाईन परमिशनसाठी आवश्यक असते. गंगोत्री बाजारात बराच वेळ चौकशी केल्यानंतर एका रिअल एडवेंचर नावाच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलो. त्या सद्गृहस्थाला  सगळी माहिती सांगितली. जाण्याचा एक दिवस दुसऱ्या दिवशी गोमुख, तपोवन व मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी परत येणे. याचा त्याने हिशेब केला.  रजिस्ट्रेशन फी दीडशे रुपये प्रत्येकी अधिक पत्र देण्याचे रु एक हजार, पोर्टर त्याचे एक हजार प्रति दिन, गाईड देणार होता त्याचे दोन हजार रुपये प्रतिदिन,  तंबू रु दोनशे प्रति दिन, स्लीपिंग बॅग रु शंभर प्रति दिन, झोपण्यासाठी मॅटिंगचे रु पन्नास प्रति दिन, आणि तीन दिवसांची खाद्यपदार्थ व स्टोव्हची व्यवस्था एवढ्या सगळ्याचे त्याने पंधरा हजार रुपये सांगितले. कमी करा म्हणून विनंती करूनही तो अडून बसला. तो फारच महागडा असल्यामुळे मी त्याचा नाद सोडून दिला व तेथून बाहेर पडलो. दुसऱ्या एका ॲडव्हेंचर एजन्सीकडे गेलो. त्याला आधार कार्ड दिले. तो मला उत्तर काशीहून परवानगी, सामान मागवायला लागेल वगैरे कारणे सांगू लागला. त्याचे दुकानाचे काम चालू होते. सिझन सुरू होत  असल्यामुळे दुकान दुरुस्त करणे या  गडबडीत तो होता. मी बाहेर  दुसरीकडे काही व्यवस्था होईल का याची चौकशी करत होतो. पण काही झाले नाही. शेवटी बसस्टँड शेजारील फॉरेस्ट ऑफिसमध्ये गेलो. इथून काही होणार नाही, तुम्हाला ऑनलाईनच परवानगी घ्यायला लागेल असे उत्तर मिळाले. आता तिथे ऑनलाइन परवानगी घ्यायची म्हणजे ऑनलाइन फॉर्म भरा, त्याला डॉक्युमेंट्स स्कॅन करून जोडा आणि पैसे कसे भरायचे, कारण कनेक्टिव्हिटी हा तिथे प्रॉब्लेम होता. मी बराच वेळ थांबल्यामुळे  शेवटी तिथल्या अधिकाऱ्याने सांगितले, आमच्या इथे काही होत नाही, तुम्ही वरती  राम मंदिरापाशी आमचे फॉरेस्ट ऑफिसर बसतात त्यांना भेटा. आम्हाला वाटले जवळ असेल. चालत निघालो. वाटेत एक जण पत्र्याच्या कुटीसमोर पहुडले होते. त्यांना फाॅरेस्ट ऑफिस कोठे आहे म्हणून विचारले. ते म्हणाले, फॉरेस्ट ऑफिस सरळ पुढे दोन किलोमीटरवर राम मंदिराच्या शेजारी आहे. पोटात गोळा आला. नुसती चौकशी करायला दोन किलोमीटर !!! ते ही चढाच्या रस्त्यावर !!! गरजवंताला अक्कल नसते. आम्ही पुढे  निघताना, थोडे बसा मी चहा देतो ते म्हणाले. परंतु आमच्या दृष्टीने परमिट घेणे हे जास्त महत्त्वाचे असल्यामुळे त्याचे आभार म्हणून आम्ही पुढे निघालो.   जवळजवळ पाऊण एक तास चालल्यानंतर वनखात्याच्या ऑफिस पाशी पोचलो. गंगोत्री दहा हजार फुटावर आहे.
अति उंचीवरील ठिकाणी  हवेत ऑक्सिजन कमी असतो, तसाच तो गंगोत्रीलाही होता.
 मी नुकताच गंगोत्रीला आल्यामुळे व त्या हवेचा सराव व्हायच्या आतच धावपळ करायला सुरुवात केल्यामुळे दम लागायला लागला. हळूहळू चालण्याशिवाय पर्याय नव्हता.  वनखात्याच्या ऑफिस मध्ये पोचल्यानंतर थोडावेळ बसलो. तिथल्या अधिकाऱ्यांची बोललो. मला इथून काहीच करता येणार नाही. तुम्हाला तपोवनसाठी सगळे ऑनलाईनच करावे लागेल. कारण ऑनलाइन अर्ज करताना ॲडव्हेंचर कंपनीचे पत्र हे आवश्यक आहे.  काय करावे मला समजेना. तेवढ्यात आठवले संजीवकुमार सेमवाल यांना फोन लावावा. 


पुण्याहून निघताना निवास व्यवस्थेसाठी गंगोत्रीतील भागीरथी सदनचे मालक आणि गंगोत्री मंदिरातील पुजारी संजीव कुमार सेमवाल यांच्याशी मी बोललो होतो. शेवटचा प्रयत्न त्यांची काही मदत होईल का पहावे म्हणून, त्यांना फोन लावला.  सुदैवाने त्या ठिकाणाहून त्यांना फोन लागला.  गेले अनेक दिवस त्यांचा फोनच लागत नव्हता. आज नशिबाने लागला. परमिटची अडचण आहे, तर तुम्ही अधिकाऱ्यांची बोलता का असे त्यांना म्हणालो.  ते फॉरेस्ट ऑफिसरशी बोलले.  संबंधित फाॅरेस्टरने उद्या सकाळी साडेसात वाजता या,  तुम्हाला परमिट देतो असे सांगितले. त्यांचे आभार मानले आणि पुन्हा चालत गंगोत्रीच्या निवासस्थानाच्या दिशेने कूच केले.

खाली येऊन पोर्टर शोधला. त्याचे गाईड वजा पोर्टर वजा स्वयंपाकी अशा सर्व कामांचे  पैसे ठरवले. त्याला ॲडव्हान्स दिला आणि शांतपणे भागीरथी सदनकडे निघालो. सगळ्यात चार तास गेले.
कमल साही हे पोर्टरचे नाव. तो नेपाळचा नागरिक. त्याचे वडील, चुलत भाऊ व इतर नातेवाईक उदरनिर्वाहासाठी गंगोत्रीत राहतात. सगळ्यांची कुटुंबे नेपाळमध्ये. गंगोत्रीत सर्व पोर्टर नेपाळी दिसून आले. पोर्टरला २५ किलो वजन वाहण्यासाठी रु १००० एवढा दररोजचा आकार द्यावा लागतो. ते जास्तीचीही मागणी करतात. गंगोत्रीहून निघाल्यापासून परत येईपर्यंतच्या सर्व दिवसांचे पैसे द्यावे लागतात. मला तीन दिवसांच्या गोमुख तपोवन ट्रेकसाठी एकूण रु १००००/- एवढा खर्च आला. मी एकटा असल्यामुळे खर्चीची विभागणी होऊ शकली नाही. अन्यथा ३-४ व्यक्तींच्या तीन दिवसांच्या ट्रेकसाठी सामान वाढले तरी , ते २५ किलोच्या आत असल्यामुळे परमिट खर्च वगळता एवढाच खर्च येऊ शकतो. 

गोमुख साठीचे ऑनलाईन परमिट काढताना, ॲडव्हेंचर/ ट्रेकिंग कंपनीचे पत्र तुम्हाला आवश्यक नाही, हे आम्हाला नंतर समजले. काही हुशार पोर्टर, ट्रेकर्सना फक्त गोमुखचे ऑनलाईन परमिट काढायला सांगतात. नंतर तेथे पोहोचल्यावर सकाळी कोणी उठायच्या आत गंगा नदी, ट्राॅलीतून किंवा पाण्यातून पार करतात आणि गोमुखच्या परमिटवर तपोवनला जातात. कोणाला या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही. आमच्या हुशार पोर्टरने आम्हाला हे काही सांगितले नाही.असो. नशीब आपले.

दरवर्षी एक मे नंतर परमिट गंगोत्री च्या बस स्टॅन्ड शेजारील ऑफिस मधून द्यायला सुरुवात होते ही परमिट फक्त गोमुख पर्यंतची दिली जातात. तपोवन चे परमिट हवे असल्यास ते ऑनलाईनच काढावे लागते.  परमिटचा शासकीय अर्ज भरून सोबत दीड ते दीडशे रुपये प्रति व्यक्ती भरून अर्ज करावा लागतो. या कामासाठी वनखात्याने सकाळी आठ ते दहा व सायंकाळी पाच ते सात एवढी वेळ उपलब्ध करून दिलेली आहे. त्या वेळेव्यतिरिक्त गेल्यास दुसऱ्या दिवशी परमिट मिळते. परमिट काढताना ओळख म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा शासकीय ओळखपत्र पाहून ते वनखात्याच्या ऑफिसमध्ये जमा करून घेतात. आपण परत आल्यानंतर ते ओळखपत्र परत मिळते. याव्यतिरिक्त शिवाय पाचशे रुपये डिपॉझिट घेतले जाते. आपण नेताना नोंदवलेल्या प्लास्टिकच्या वस्तू किंवा त्याची रॅपर्स परत आणलेली आहेत हे पाहून डिपाॅझिट परत केले जाते. परमिट हे फक्त दोन दिवसासाठी दिले जाते त्यापेक्षा जास्त राहिल्यास प्रतिदिन पन्नास रुपये एवढा आकार परत आल्यावर द्यावा लागतो

पोर्टर कमल साही ने किराणा माल, राॅकेल, तंबू, मॅट , घरचा स्टोन्स जमा केले व रूमवर आणून ठेवले. त्याला सकाळी ६.३० ला बोलावले. 

रात्री ट्रेकच्या विचाराने व अति थंड तापमानामुळे ( -१° ) नीट झोप लागली नाही. वनखात्याच्या गेटवर पोहोचलो. साहेब चक्क तयार होऊन बसले होते. मला आश्चर्य वाटले. नंतर साहेबांनीच कारण सांगितले. त्यांचे जिल्हा वनाधिकारी ( DFO ) आणि उत्तरकाशीचे रेंजर  दोघेही गोमुख व तपोवन भेटीवर आमच्या पाठोपाठ येणार होते. त्यांना माझ्याकडून नीट माहिती, वेस्ट कलेक्शन बॅग मिळाली असे साहेबांना आवर्जून सांगायला सांगितले. त्या बरोबर आमच्या तीन स्लीपिंग बॅग घेऊन जाण्याचे सांगितले होते. त्यांचे प्रति बॅग, प्रति दिन रु शंभर याप्रमाणे रु नऊशे त्याला द्यायचे होते. आम्हाला स्लीपिंग बॅगची गरज होती. त्यानेही मदत केल्याबद्दल हात मारला. एवढेच नव्हे तर आम्ही परत आल्यावर तो ऑफिसमध्ये हजर नव्हता. त्यामुळे स्लीपिंग बॅग चेक पैसे तेथील शिपायांकडे कसे द्यायचे याचा विचार आम्ही त्यावेळी दिले नाहीत. तर पठ्ठ्याने कमल ला फोन करून पैसे देण्याची सूचना केली...

सगळे सोपस्कार, स्लीपिंग बॅग भरून आम्ही आठ वाजता संस्मरणीय अशा गोमुख, तपोवन ट्रेकसाठी निघालो. सकाळ असल्याने चांगली थंडी होती. कानटोपी, ग्लोव्हज घालून चालत होतो. संपूर्ण गोमुख पर्यंत चढाचा रस्ता असणार होता. १०००० फुटापासून १३३०० फुटांपर्यंत जायचे होते. साहजिकच प्रत्येक पाऊल उर्ध्व दिशेने टाकत होतो. 

चि मिहिर, माझा मुलगा याच्या प्रोत्साहनामुळे मी गोमुख, तपोवन ट्रेकला निघालो होतो. हळूहळू चालावे लागत होते. मनाने तुम्ही कितीही तरूण असला तरी शरीराचे ऐकावे लागते... मनात खूप औत्सुक्य होते. काठीचा आधार, पाठीवर सॅक चढाचा रस्ता... कुठे मातीचा तर कुठे पडलेले दगड आच्छादून केलेला, कुठे पायऱ्या तर कुठे डोंगरावरून वाहात येणाऱ्या पाण्यातून... दहा पावले टाकली तर श्वास वाढायचा. थांबावेच लागायचे. सुरुवातीला अर्ध्या तासाच्या रस्त्यात मोबाईल चालू होते. नंतर आपण खरे संपर्कहीन होतो. हळूहळू आपण हिमालयाच्या कुशीत जातो मागचे सगळे विसरून आपली वाटचाल सुरू राहते. मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून आता आपल्याला जास्तीत जास्त वेळ बॅटरी टिकवायची असते. मोबाईलचा खरा उपयोग आता आपल्याला करता येणार असतो तो,  फोटो काढणे व्हिडिओ शूटिंग करणे या कामासाठी. आपण जिथे जाणार आहोत तिथे विज नाही, जनरेटर असला तरी तो डिझेलवर चालणारा. सोलर वर जेवढी वीज निर्माण होईल तेवढ्या विजेवर अत्यावश्यक गोष्टी स्वयंपाक जेवण इत्यादी केल्या जातात. उरलेला शिल्लक वीज तेथील स्थायिक लोक मोबाइल चार्ज करण्यासाठी वापरतात.  आम्हालाही आता मोबाईलची बॅटरी जास्तीत जास्त  निसर्गाला मोबाईलच्या कॅमेरात बंद करण्यासाठी वाचवून ठेवायला हवी होती. 

दोन अडीच तासांच्या चालल्यानंतर आम्ही थांबलो.  कमल सहीने पाठीवरचे सामान उतरवले. स्टोव्ह काढून आधी गरम पाणी केले. कारण रस्त्यात असणाऱ्या सर्व ओहोळांचे पाणी बर्फासारखे थंड असते.  चालताना घाम येतो, पण थंडी असल्यामुळे तहान लागत नाही. त्यामुळे पाणी पिणे होत नाही. आवर्जून पाणी प्यायले पाहिजे. सर्वसाधारणपणे सर्व ट्रेकर्सना पाणी कमी पिल्यामुळे मुतखड्याचा त्रास होतो असा अनुभव आहे. त्यामुळे स्टोव्ह पेटवल्यावर शक्य तेवढे गरम पाणी पिणे गरजेचे ठरते. गरम पाणी पिऊन झाल्यानंतर चहा बनवला. चहा आणि पार्ले जी बिस्किटे. या थंड हवेमध्ये चहा आणि सोबत बिस्किटे. याचा आनंद फक्त त्यावेळी तेथे चालून दमलेल्या व थंड हवेत गरम काहीतरी हवे असलेलाच सांगू शकतो. केवळ स्वर्ग...  चहा बिस्किटे खाऊन पाच मिनिटे बसून पुन्हा वाटचाल सुरू केली

आपण चालताना सर्व गोष्टींचे भान ठेवावे लागते. पायवाटेवर नीट चालत आहोत ना, वरून दगड तर कोसळणार नाहीत ना, त्याबरोबरच आजुबाजूचा निसर्ग, पक्षी, प्राणी,  झाडेझुडपे, फुले, फुलपाखरे तसेच साधे मातीचे डोंगर, अंगावर ल्यायलेले बर्फाचे डोंगर अशा अनेक गोष्टींचे व्यवधान सांभाळावे लागते. कारण आपण काही इथे सतत येणार नसतो. त्यामुळे जे समोर, आजूबाजूला आहे ते डोळ्यात साठवून, मनात जतन करता आले पाहिजे. माणसाला एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जाताना जेवढा उत्साह ताकद ऊर्जा असते तेवढे ते साध्य झाल्यानंतर नसते. त्यामुळे सर्व गोष्टी जातानाच काळजीपूर्वक पाहाव्यात, आनंद घ्यावा हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. येताना पोहोचण्याची घाई झालेली असते. रस्त्यामध्ये छोटी छोटी ४-५ इंचाच्या उंचीची झुडपे होती. त्याला गंगा तुळशी म्हणतात. श्वास घेताना त्रास व्हायला लागला तर त्याची चार पाने तोडून त्याचा वास घेतात म्हणजे श्वास सुरळीत होण्यास मदत होते असे आम्हाला सांगितले गेले. त्याचा सुगंधही छान असतो. कधीकधी चालताना मधुनच त्या झुडपांचा सुगंध सुद्धा आपल्याला येत असतो. जसा रातराणीचा मोगर्‍याचा सुगंध येतो तसा... परिस्थितीनुरूप निसर्ग सुद्धा तुमच्या साठी काही गोष्टी देत असतो. त्यामुळे घरून कापूर नेण्याची आवश्यकता नाही असे जाणवले.

 गंगोत्रीहून निघाल्यापासून आठ किलोमीटरवर चीरबासा नावाचे ठिकाण लागते. चीर म्हणजे चीरपाईन वृक्ष आणि बासा म्हणजे जंगल. येथे चीर पाईन नावाच्या वृक्षांचे जंगल आहे. थोडक्यात या भागात चीरपाईन वृक्ष भरपूर प्रमाणात दिसून येतात. चीरबासामध्ये वनखात्याचे एक छोटे चेक पोस्ट आहे. गंगोत्री हुन निघालेल्या प्रवाशांचे परमीट येथे पाहण्याचे काम केले जाते. पण आम्ही तेथून जाताना ते बंद होते. तिथे कुणीही नव्हते. सर्वसाधारणपणे एक मे नंतर परमिट खुली होतात. म्हणजे गंगोत्री च्या बस स्टँड जवळ असलेल्या वनखात्याच्या ऑफिस मधून अर्ज करून गोमुखी परमिट दिली जातात कारण एक मे नंतर यात्रेकरू, पर्यटक आणि गिर्यारोहक यांचा ओघ वाढतो. एक मे नंतर दररोज सुमारे १५० एवढी परमिट गोमुख साठी दिली जातात. विना परमिट कोणी पुढे जाऊ नये म्हणून या चेकपोस्टची व्यवस्था केली आहे

गंगोत्रीला आपल्या समोर वाहणारी गंगा नदी आता हळूहळू आपल्यापासून खाली जाऊ लागते आणि आपण हिमालय मध्ये वरती चढायला सुरुवात करतो. गंगा नदी आणि आपल्यातले अंतर वाढू लागते. रस्ताही बारीक होऊ लागतो. तोल सांभाळून चालणे गरजेचे बनते. रस्त्याने चालताना इकडे तिकडे न बघता चालणे श्रेयस्कर. कारण एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी यामध्ये आपले पायवाट असते. आपणांस या भागात फिरण्याचा सराव नसल्यामुळे अनर्थ होऊ शकतो, दुर्घटना घडू शकते. म्हणून काही पाहायचे वाटल्यास थांबावे, बघावे आणि मग निघावे. चालता चालता बघताना जर पाय घसरला, चुकला तर कपाळमोक्ष नक्की. आणि निसर्ग विशेषतः हिमालयामध्ये क्षमा नाही. खरेतर तुम्ही निसर्गात फिरायला, मजा करायला, आनंद घ्यायला आलेले असता, तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. मग घाई-गडबड  कशासाठी ? आणि तुम्ही घाई गडबड करू शकत नाही. कारण तुम्ही गडबडीने चालू लागला तर दम लागतो. त्यामुळे थांबावेच लागते आणि एवढा खटाटोप करून आलेलो आहात आणि अशी वेळ नेहमी थोडीच येणार आहे ?

दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्ही चीरबासा येथे पोहोचलो.  तेथे  दोन शेड बांधून, एका ठिकाणी विश्रांतीची तर दुसऱ्या ठिकाणी स्वयंपाकासाठी ओटे बांधून, त्याला आडोसा तयार करून स्वयंपाक करण्याची व्यवस्था केलेली आहे. या भागात भरपूर वारा असल्यामुळे स्टोव्ह पेटवताना वारा लागू नये म्हणून तशी तजवीज करून ठेवली आहे. जंगलामध्ये आपल्याला लाकूड पेटवता येत नाही. लाकूड पेटवल्यास ठिणगीने आजूबाजूच्या असलेल्या वनसंपदेला आग लागून ते नष्ट होण्याची शक्यता असते. त्याबरोबरच तिथे असणारे पशु पक्षी, प्राणी, कीटक आणि इतर वनसंपदाहु नष्ट होऊ शकते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल रॉकेल यावर चालणारे स्टोव्ह याच्यावरच आपल्याला स्वयंपाक करावा लागतो. चुकून लाकुड पेटवून स्वयंपाक करताना आढळल्यास शिक्षा, दंड  किंवा दोन्ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याही पुढे जाऊन असे सांगावेसे वाटते की आपण निसर्गात गेल्यानंतर निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची गरज आहे. शहरात आपण वाटोळे केलेच आहे निदान जंगलात, हिमालयात तरी तेथील वनसंपदा जतन करण्याचे काम आपण नक्की केले पाहिजे.

चीरबासा येथे पोहोचल्यानंतर कमलने स्टोव्ह पेटवून त्यावर आधी गरम पाणी तयार केले ते पाणी आम्ही प्यायल्यावर, मग मॅगी तयार केली. पोटभर मॅगी खाऊन झाल्यावर, चहा केला. तो पिऊन सुमारे अर्धा तास विश्रांती घेतली. विश्रांतीपूर्वी कमलने स्टोव्ह बंद करून, त्यातले केरोसीन कॅनमध्ये भरले. सगळे आवरले. ओला कचरा टाकण्यासाठी तेथे कचरा पेटी होती. त्याच्यात ओला कचरा टाकला. कोरडा कचरा आम्ही आमच्याकडील गार्बेज बॅगमध्ये घेतला. खाली पडलेले सगळे स्वच्छ केले. एक ते दीड आमची वामकुक्षी झाली. काही राहिले नाही हे तपासून आम्ही पुढे प्रयाण केले. सकाळी आठ पासून आतापर्यंत म्हणजे दुपारी साडेबारा पर्यंत साडे चार तासात आठ किलोमीटरचा प्रवास झालेला होता.  चहा आणि जेवणाचा वेळ लक्षात घेता ताशी सरासरी दीड ते पावणेदोन किलोमीटर या वेगाने आम्ही हिमालयामध्ये, चढावर वाटचाल करीत होतो. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार हे अंतर कमी किंवा जास्त होऊ शकते. खरे सांगायचे तर हे असे ट्रॅक चाळीशी पूर्वी किंवा तरुण असताना, अंगात उत्साह, ताकद असताना, धाडस करण्याची शक्ती असताना, मन तरुण असताना शरीर तरुण, असताना केले पाहिजेत. विशिष्ट वयानंतर मर्यादा येत जातात. क्षमता कमी होते कॉन्फिडन्स राहत नाही‌ भीती वाटते आणि आपली जबाबदारी विनाकारण दुसऱ्या माणसावर येऊन पडते. तेव्हा अजूनही शक्य  असेल तर अशा गोष्टी लवकरात लवकर करून आनंद घ्यावा हे बरे...

बरोबर दीड वाजता आम्ही पुढे प्रयाण केले अजून पाच किलोमीटर नंतर पुढचा मुक्काम होता. आता चढ अधिकाधिक वाढू लागला. पुढचा मुक्काम पाच किलोमीटरवर भोजबासा येथे होता व तेथेच आम्ही राहणार होतो. त्याच्यापुढे मुक्कामाची सोय नाही. पुढे गेल्यानंतर मोकळ्या हवेत पर्वताच्या पायथ्याशी, बर्फाच्या सान्निध्यात, वाऱ्यामध्ये आणि हिमनदी कोसळण्याच्या, दरड कोसळण्याच्या शक्यतेमध्ये, तंबूत रात्री राहावे लागते. 

चालताना फारसे कुणी आम्हाला दिसले नाही फक्त दिसले ते काम करणारे मजूर. खचलेला रस्ता तयार करणे, दगड लावणे, भराव टाकणे, दगडांची भिंत बांधणे,  गरज पडली तर सिमेंट लावणे अशी कामे मजूर करत होते.   हे मजूर रोजंदारीवर काम करतात बिगारी कामगारास पाचशे रुपये तर मिस्त्री ला सहाशे रुपये रोज मिळतो. खाण्याची व्यवस्था शासन करते. या ठिकाणी या मजुरांची राहायची व्यवस्था उत्तराखंड शासनाने केलेली आहे.  दररोज यांना ये-जा करावे लागत नाही. तेथेच रहायचे आणि तेथेच काम करायचे याचे कारण आहे की काही विशिष्ट पट्ट्यामध्ये सतत रस्ते असतात वरून दरडी कोसळतात. मोठे दगड पडल्यामुळे  रस्ते नष्ट होतात. ते पुन्हा पुन्हा करत राहावे लागते. कारण हिमालयामध्ये सर्व अनिश्चितता आहे. रस्ते बंद होऊन चालणार नाही. त्यामुळे काम सतत चालू ठेवावे लागते आणि रस्त्यांवर रोज लक्ष ठेवावे लागते. कारण रसद पोहोचवणे आणि ये-जा करण्यासाठी रस्ते वापरायोग्य राहिलेच पाहिजेत.

गंगोत्री पासून दूर हिमालयात प्रतिकूल परिस्थितीत थंडी, वारा, ऊन, पाऊस, हिमवर्षाव, कडे कोसळणे, दरड कोसळणे, दगड कोसळणे या सगळ्यांमध्ये ही माणसं सतत काम करीत असतात. तरी ते हसतमुख असतात. आपल्याला नमस्कार करून पाणी हवे का हे आवर्जून विचारतात. आलेल्या पाहुण्याला पाणी विचारण्याची संस्कृती हिमालयात सुद्धा अजून टिकून आहे. पोर्टर असो गाईड असो किंवा रस्ता बांधणे, दुरुस्त करणारे कामगार असोत अतिशय माफक मजुरीवर जीव धोक्यात घालून त्यांना काम करावे लागते. जगण्याची धडपड दूरवर हिमालयात चालू आहे. ती पाहायला मात्र कोणी नाही. काम करणारा मजूर, रस्ता दाखवणारा गाईड आणि सामान वाहणारा पोर्टर यांच्या या प्रवासामध्ये अनिश्चिततेमुळे उद्याची खात्री नाही. जिवंत परत येऊन काही माहिती नाही उद्याचा दिवस दिसेल का नाही हे सांगता येत नाही. तरीही पोटासाठी ते हे करतात. हे सर्व मजूर नेपाळहून उदरनिर्वाहासाठी येथे आले आहेत.

दुपारी साडेचार वाजता आम्ही भोज बासा येथे पोचलो. भोज म्हणजे भूर्ज आणि बासा म्हणजे जंगल. येथे भूर्ज वृक्षांचे जंगल म्हणून भोज बासा असे नाव आहे. पूर्वी ऋषी मुनी भूर्जपत्रावर लेखन करायचे. भूर्ज वृक्षांची साल म्हणजे भूर्जपत्र... येथे वनखात्याचे ऑफिस आहे. पोलिस स्टेशन आणि त्यांची निवास व्यवस्था आहे. गढवाल मण्डल विकास निगम यांची निवास व्यवस्था आहे आणि लाल बाबा म्हणून एक साधू होते त्यांचा मोठा आश्रम आहे. यापैकी गढवाल मण्डल निगम मध्ये बुकिंग करून व्यवस्था होऊ शकते. तर लाल बाबांच्या आश्रमामध्ये ऐन वेळेला उपलब्धतेनुसार निवासव्यवस्था आणि भोजन व्यवस्था होऊ शकते. लाल बाबाच्या आश्रमामध्ये डॉर्मेटरी पद्धतीची म्हणजे एका खोलीमध्ये दहा लोकांना राहण्याची सोय होते. याप्रमाणे एकूण ७५ लोक वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात. लालबाबा आश्रमामध्ये प्रति व्यक्ती प्रति दिन रुपये ४००/- एवढा आकार घेतात. यामध्ये ब्लॅक टी, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण याचा समावेश आहे. गढवाल मण्डलच्या रिसॉर्टमध्ये सुमारे ७५ लोकांची डॉर्मेटरी पद्धतीने निवास व्यवस्था होऊ शकते. त्याचे ते प्रति व्यक्ती प्रतिदिन रुपये ७००/- एवढा आकार घेतात. त्याव्यतिरिक्त चहा नाश्ता आणि जेवण याचे पैसे वेगळे द्यावे लागतात.

 सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत लाल बाबा आश्रम, गढवाल मंडल निगमचे रिसॉर्ट आणि पोलीस यांचे प्रिमायसेस बंद असतात. फक्त वनखात्याचे कर्मचारी तेथे उपलब्ध असतात. एखादा साधुसंत विशेष शासकीय विशेष परवानगीने लालबाबा आश्रमात अति थंडीच्या मुक्काम करू शकतात. बर्फ असल्यामुळे कुठेही बाहेर पडता येत नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असते. त्यामुळे येथे जाण्याची इतरांना परवानगी मिळत नाही आणि तसे धाडसही कोणी करू नये.

*टीप : गोमुख तपोवन साठी बरेच लेखन* *असल्यामुळे त्याचे एकापेक्षा अधिक भाग* *होण्याची शक्यता आहे. कृपया नोंद घ्यावी ही* *विनंती. 

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

चारधाम यात्रा

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - ३*


ऋषिकेश होऊन पुढे निघालो. पहाटे पावणे चार वाजता रामानंद आश्रम सोडला. गल्लीबोळातून चालत असताना, १-२ श्वान अंगावर धावून आले. मी शांतपणे चालत राहिलो. मी निरुपद्रवी आहे हे लक्षात आल्यावर ते शांत झाले.  वाटेत एक-दोन रिक्षाचालक ग्राहकांची वाट पहात बसले होते.  गुगल बाबा की जय. तो दाखवत असलेल्या रस्त्यावरून गंगा किनार्‍यावरुन चाललो होतो. दूरवर कुठेतरी श्वानांचा आवाज येत होता. किनाऱ्यावरून चालताना  उजव्या हाताला गंगामैयाचा खळखळ आवाज शांततेत जाणवणारा. तर डाव्या हाताला आश्रम, हॉटेल, लॉजेस. उजव्या हाताला *जानकी सेतू*, पादचारी आणि दुचाकींसाठी बांधलेला. अंधारात त्याच्यावरील दिवे लक्ष वेधून घेत होते. बसण्यासाठी बांधलेल्या तसेच गंगा किनारी काही यात्रेकरू उघड्यावर झोपले होते. पहाटेच्या वेळी रस्त्यावर मी एकटाच.

रामानंद आश्रम मनाला भावला.  दिखाऊपणा नाही, भपका नाही‌.  तेथे राहण्याचा योग आला. वेळ आली राहिलो, आनंद घेतला, निघालो... आपल्या सर्वांना नदी, नाले, झरे, वारा यांच्यासारखे वाहते राहता यायला पाहिजे.  वाहणारे पाणी स्वच्छ राहते. मनाला भावते.  रोगराई होत नाही. बंद खोलीतील हवा कुबट होते. तसेच माणसाने सुद्धा सतत वाहते राहायला पाहिजे. याचा अर्थ संसार सोडून संन्यासी व्हावे असे नाही.  तर घराबाहेर पडून प्रवास 
करण्याऐवजी शरिराचे चोचले पुरवणाऱ्या ठिकाणी थांबून, अडकून पडू नये. नाहीतर एक प्रपंच सोडायचा आणि दुसरा तयार करायचा असे होते.  हे लक्षात येत नाही, हे खरे.
चरैवेति चरैवेति...
चालत राहा... चालत राहा...

चालताना वाटेत पेड पार्किंग बाहेर बसलेल्या दोघांना नरेंद्र नगर चा रस्ता विचारला. त्यांनी दाखवलेल्या दिशेने चालू लागलो.  त्यातला एक जण म्हणाला बाबूजी नरेंद्रनगर तो यहा से बहुत दूर है टॅक्सी करनी पडेगी.  मी ठिक आहे असे म्हणालो आणि पाऊल उचलले. पुढे चढाचा रस्ता लागला.  गुगल बाबांनी जिथे वळायला सांगितले होते तिथे रस्त्यावर पाणी जाण्यासाठी चारी बांधली होती आणि त्याच्या मागे जंगलात जाणारी पायवाट दिसत होती. गुगल बंद केले व तसाच पुढे चालत राहिलो. रस्त्यावर विचारायला कोणी नव्हते.  पुढे गेल्यावर हायवेवर पाटी लागली नरेंद्र नगर.  डाव्या हाताला वळलो. आपले लक्ष नरेंद्रनगर होते.  इथून पुढे चढाचा रस्ता... घाट... घाट आणि घाट.  हिमालयात जाण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. समोरून मागून वाहने चालली होती. अर्धा तास चालल्यानंतर एका ठिकाणी तीन रस्ते येऊन मिळाले होते. तेथे पोलिसांनी पुढे जाणारा रस्ता बंद केला होता.  चौकशी केल्यावर पुढे दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होता व राडारोडा उचलून रस्ता क्लिअर करण्याचे काम चालू होते. त्यामुळे रस्ता बंद केल्याचे त्यांनी सांगितले. थांबलेल्या वाहनातील, रात्रभर प्रवास करून आलेले प्रवासी बराच वेळ वाहन थांबून ठेवल्यामुळे त्रस्त होऊन गाडीतून खाली उतरून येरझाऱ्या मारत होते. पोलीस चेक पोस्ट शेजारीच काली मातेचे मंदिर होते. सकाळच्या शांततेत कोणीतरी घंटा वाजवली त्याचा आवाज निरव शांततेत छान घुमला. मी चालत चाललो आहे, असे सांगितल्याने मला पुढे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली.पोलिसांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी पुढे निघालो.


 माझ्यासोबत एका हातात काठी व एका हातात पाण्याचा कॅन घेऊन एक जेष्ठ नागरिक पुढे चालले होते. झप झप  चालून त्यांना गाठले आणि चौकशी केली.  त्यावर त्यांनी मी व्यायामाला चाललो असून त्यांचे नाव केपीएस नेगी असे त्यांनी सांगितले . हातातला कॅन,  लावलेल्या झाडाला पाणी घालण्यासाठी घेऊन जात आहे असे ते म्हणाले नेगी हे आडनाव ऐकल्यावर मला पूर्वी भारतीय हॉकी संघात असलेल्या मीर रंजन नेगी या गोलकीपर ची आठवण झाली. चालताना ते हातातील काठी रेलींगवर आपटत आवाज करत चालले होते. याचे कारण विचारले असता रात्री रस्त्यावर हत्ती येतात‌. त्यांना पळवण्यासाठी मी काठीचा रेलींगवर आवाज करतो असे त्यांनी सांगितले. ऐकून माझी दातखीळ बसली.
काठीच्या आवाजाने बाकी जंगली पशु पळून जातात. पण हत्ती मात्र जाम हलत नाही. तो ठाम उभा राहतो व प्रसंगी अंगावर धावून येतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली.  हे गृहस्थ दहा मिनिटात परत जाणार होते. पुढे अंधारात घाट रस्त्यावर जंगलातून मला एकट्यानेच प्रवास करायचा होता. सगळाच उत्तराखंडाच्या घाट रस्ता जंगलाचा आणि प्राणी असलेला असा आहे.
हा प्रसंग माझ्यावर आला असता तर सामान टाकून पळून जाण्याशिवाय माझ्या हातात दुसरे काही नव्हते.  बघू या. गुरुदेव दत्त म्हणालो, जे येईल त्याला सामोरे जाण्याचे ठरवले आणि मी रेलींगवर काठी आपटत पुढे निघालो‌.

नरेंद्र नगर, हिंडोलाखाल, दुवाधार, आगराखाल, फकोट, बेमुंडा, खाडी, नांगणी, चंबा ही रस्त्यातील काही गावांची नावं.  गूगल बाबांनी दाखवलेल्या दोन गावाच्या मधील अंतर आणि प्रत्यक्षात अंतर यात फरक असल्याचे लक्षात आले. चंबाला नाष्टा केला चहा पिताना टपरीवाल्याशी बोलताना तो म्हणाला की, येथून गंगोत्री दोनशे किलोमीटर आहे. नवीन धरण बांधल्यामुळे आधीचा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे गंगोत्रीला जाताना तीस ते पस्तीस किलोमीटरचा फेरा पडतोय व त्यामुळे अंतर वाढले आहे अशी माहिती त्यांनी टपरी चालकाने मला पुरवली.

उत्तराखंड म्हणजे डोंगरी भाग. गंगोत्रीला जाताना जास्त चढ उतार कमी.  या राज्यात अनेक डोंगर रांगा आहेत.  येथील सर्वात मोठे शिखर नंदादेवी. आपण सुरुवात करतो छोट्या डोंगरातून पुढे हळूहळू गगनचुंबी सुळके स्वागतासाठी उभे असतात. त्यानंतर हळूहळू दिसू लागतात बर्फाच्छादित डोंगर आणि त्यांच्या अंगावर वाढलेले सूचिपर्णी वृक्ष. 

या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO ) आणि स्थानिक प्रशासन यांचे रस्ता बांधणी व  देखभाल आणि दुरुस्ती यांचे काम ३६५ दिवस चालूच असते. कोसळलेल्या दरडी उचलणे, रस्ता मोकळा करणे, वाहून गेलेला रस्ता पुन्हा नीट करणे, पूल दुरुस्त करणे,  कोसळण्याची शक्यता असलेल्या दरडी उतरवणे अशी अनेक कामे ते अविश्रांत करत असतात. सर्व रस्त्यावर जागोजागी पाट्या लावलेल्या दिसून येतात येथे थांबू नका, वाहन उभे करू नका, दरड कोसळण्याची शक्यता इत्यादी... वाटेत एका ट्रकचा मागचा ॲक्सल तुटून , मागील दोन चाके वेगळी झाली होती. 

प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची धडपड चालू आहे. जसे जसे आपण पहाडी भागात आत जातो तसे तसे सर्व गोष्टींचे परिमाण बदलत जातात उपलब्ध साधन संपत्ती, सुविधा या कमी होत जातात.  या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा आहे. सर्व भार खाजगी वाहतूक व्यवस्थेवर सोपवलेले दिसतो. सहाजिकच नफेखोरीसाठी जास्त प्रवासी भरून वाहने निघणे यावर कंत्राटदारांचा भर असतो. पंचवीस क्षमतेच्या बसमध्ये ४५ लोक भरले जातात. हात दाखवल्यावर वाहन उभे राहते. भाजीपाला, दूध, फळे, किराणामाल दूरवरून आणावा लागतो.
१०० किलोमीटरच्या परिसरात एखादे कॉलेज. इंजीनियरिंग कॉलेज राज्याच्या मुख्यालयामध्ये म्हणजे डेहराडूनला. आरोग्य सेवांची व्यवस्था तर विचारूच नका. जिल्हा आरोग्य केंद्रांमध्ये एक पुरुष व एक महिला डॉक्टर. तेच सर्व आजारांवर उपचार करणार. बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्यास पेशंटला सुरक्षित रुग्णालयात हलवे पर्यंत रुग्ण दगावणावरच. एकट्या पुणे शहरात ७० हून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत असे समजते. आपला आदिवासी भाग व येथील दुर्गम डोंगरी भाग यात फार फरक नाही. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी पण आदिवासी आणि डोंगरी लोक अजून दुर्लक्षितच आहेत असे खेदाने नमूद करावेसे वाटते. दोन वर्षांच्या कोव्हिडच्या कालावधीत इथे काय परिस्थिती झाली आहे याचा आपण अंदाज तरी बांधला आहे का ?

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*

चारधाम यात्रा

*चारधाम पदभ्रमण यात्रा...*

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - २*

हरिद्वारहून पहाटे ५ वाजता ऋषिकेश ला प्रमाण केले.

पहाटे लवकर उठून आवरून, सॅक भरली. धर्मशाळेत एक लखनऊ चा बारा तेरा वर्षाचा मुलगा काम करत होता. छोटू त्यांचे नाव. अगदीच कोवळा मुलगा होता. बिचाऱ्याला या वयात काम करावे लागत होते, हे पाहून वाईट वाटले.  अशा परिस्थितीत सुद्धा तो हसत मुख होता. त्याला चहा सांगितले चहा आणून दिला, साबण कुठे मिळते विचारले तर साबण आणून दिला‌ चार हेलपाटे मारले आधार कार्डची झेरॉक्स मिळावी म्हणून... जे सांगेल ते काम विना तक्रार करत होता. त्याला म्हणालो, उद्या पहाटे निघायचे आहे.  ५ वाजता दरवाजा उघडावा लागेल म्हणून तुला सांगून ठेवलं.   मी  दरवाजाजवळच्या खोलीत झोपतो. तुम्ही मला कधीही हाक मारा. मी दरवाजा उघडेन, काळजी करू नका, असे तो उत्तरला. दरवाजा आतून लॉक केल्यामुळे त्याला उठवण्याशिवाय पर्याय नव्हता. पाच वाजता निघताना त्याला झोपेतून उठवले. त्याने दरवाजा उघडला त्याला अच्छा केला आणि निघालो.
मजबुरी...या वयातील शहरी मुलं १० हाका मारल्या तरी उठत नाहीत. जबाबदारी मुलांना पोक्त करते. काही पैसे त्याच्या हातात ठेवून निघालो. तेवढेच मी करू शकत होतो.

गल्ली बोळ पार करत गंगामैयाच्या पुलावर आलो. पुलाच्या तोंडाशी सुमारे शंभर फूट उंचीचा एक मोठा केशरी रंगाने रंगवलेला जाडजूड खांब आणि त्याच्यावर त्रिशूल आणि डमरू लावलेले होते.  पहाटेच्या वेळी अंधारात त्रिशूल आणि डमरू विशेष लक्ष वेधून घेत होते.  पूल ओलांडला आणि हरिद्वार - ऋषिकेश हायवेवर आलो. डाव्या हाताला वळून ऋषिकेश कडे कूच केले.

 रात्रभर प्रवास करून आलेल्या लक्झरी गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या.  एकेक गाडीतून यात्रेकरू उतरून हरकी पोडीच्या दिशेने मार्गस्थ होत होते. मधूनच कार हायवेवरून आत वळत होत्या. चुकून पुढे गेलेल्या मोटारी बिनधास्त राॅंग साईडने येत होत्या. उतरणाऱ्या लोकांना हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी रिक्षा, सायकल रिक्षा यांची गर्दी झाली होती. रस्त्यावर चालणारा मी एकटाच होतो. रस्त्यावर शहरात असल्यामुळे दिवे होते. पण जसजसा पुढे गेलो तसे दिवे बंद झाले. पण तेवढ्यात फटफटू लागले. त्यामुळे हेड लाईट लावावा लागला नाही. पहाटे २० ते २२ डिग्री तापमान होते. आल्हाददायक वाटत होते,  परंतु वारं असल्यामुळे  थंडी बोचरी वाटत होती.कानाला गार लागायला लागल्यामुळे खिशातून रुमाल काढून कानावर बांधला. टोपी घातलेली होतीच. सर्व सामान पाठीवर सॅकमध्ये ठेवले होते. त्यामुळे दोन्ही हात मोकळे होते. 

हरकी पोडी संपल्यानंतर हरिद्वार संपतेच. सीमेवर असलेल्या एका बागेत  शंकराची एक भव्य मूर्ती उभी केलेली होती. त्याच्यावर फोकस टाकल्यामुळे मूर्ती अंधारातही दूरवरून सहजच दिसत होती. हरिद्वार नगरीत स्वागत करण्यासाठी आणि हरिद्वार नगरीचे रक्षण करण्यासाठी साक्षात महादेव सीमेवर पहारा देत उभे असावेत असे वाटले. मूर्ती खूप मोहक आहे. मूर्तीचे फोटो काढून पाय उचलले.

चालत असताना रस्त्याला दुकानाच्या हसू येईल अशा पाट्या दिसल्या एका दुकानावर पाटी लिहिली होती मुलाला मुन्नालाल टायर पंचर दुसऱ्या दुकानावर पाटी लिहिली होती, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मिक्साॅलाॅजी...मस्त पुढे निघालो.

रस्त्याने चालताना  कधी फूटपाथ तर कधी डांबरी सडकेवरून चालत होतो. मधूनच फूटपाथ गायब, तर कधी ओव्हरब्रीजच्या कामामुळे सर्व्हिस रोड छोटा...कुठे पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी यात्रेकरूंची गाडीत बसायची लगबग सुरू होती. 
एक मूर्तीकाराच्या दुकानात छान मूर्ती करून ठेवल्या होत्या. समोरच ठेवलेली भगवान बुद्धांची
मूर्ती जणू स्वागत करीत होती.

 आकाश लाल झाले, ७ वाजले होते. दोन तास चालत होतो. चहा पिण्यासाठी थांबलो. चहावाल्याने तंदूर पेटवला होता. एक जण हात शेकत होता. धुळीसाठी लावलेला मास्क उच्छ्वासामुळे ओला झाला होता. तो तंदूर वर गरम केला. मिथुन भाई,( दुकान चालकाचे नाव ) त्याने मस्त, गरमगरम, फक्कड व ग्लासभर चहा आणून दिला. १० मिनिटे विश्रांती झाली. पुढे निघालो.

८ वाजले. पोटात कावळे ओरडू लागले होते नाष्ट्याची व्यवस्था पाहायला हवी होती. परंतु कुठेही टपऱ्या दुकाने रेस्टॉरंट उघडण्याची चिन्हे दिसत नव्हती एका ठिकाणी उभा राहून एका मोटरसायकलला हात केला आणि विचारले तेव्हा त्यांनी सांगितले पुढे उजव्या हाताला आत गावात तुम्हाला दुकानात मिळतील तिथे नाश्ता मिळेल रस्ता क्रॉस करून पलीकडे गेलो वाटेत तिथला गावकरी भेटला तो म्हणाला गावातले सगळे दुकाने बंद आहेत समोर दिसणारे दोन स्नॅक्स सेंटर चालू आहे तिथे तुम्हाला नाश्ता मिळेल पुन्हा रस्ता क्रॉस करून समोर गेलो स्नॅक्स सेंटर मध्ये बसलो काय विचारले पराठे ची ऑर्डर दिली पराठे तयार होईपर्यंत घरी फोन करुन पत्नीसह वर्षाला सकाळी निघून तीन तासाचा प्रवास झाल्याचे कळवले आठ वाजेपर्यंत एकूण 13 किलोमीटरचा प्रवास झाला होता पाण्याचा वेग चांगला होता ख्यालीखुशाली कळवून व इतर चर्चा करून चौकशी करून कप्पा वरून फोन ठेवला व पुढे निघालो दोन पराठे त्याच्यावर अमूल बटर एक चहा पाण्याची बाटली एवढ्या सगळ्या चे बिल फक्त एकशे तीस रुपये.

चालताना पुढे  एक मोठा ओव्हरब्रीज लागला. तो खूप उंच होता. एवढे चढायला नको, म्हणून मी पुलाच्या सर्विस रोड कडून पुढे जाऊ लागलो. पुढे गेल्यानंतर तो सर्विस रोड पुलाच्या शेजारून जाता जाता  डेड एंड झाला होता हे मला नंतर समजले. तसाच पुढे चालत राहिलो. चालताना काय मला काही खरे वाटेना, म्हणून समोरून येणाऱ्या दोघांकडे चौकशी केली की हा रस्ता पुलाच्या तिकडे जातो का ? त्यातला एक जण म्हणाला याच रस्त्याने पुढे जा, तर दुसरा म्हणाला, जानवर का डर हैं, इधरसे मत जाव. पूल चढके पुरसे जाव. मी तसेच पुढे जायचे ठरवले.  वाटेत रेल्वे क्रॉसिंग होते. धड रस्ताही नव्हता. कसातरी उड्या मारत,हकसरत करीत पुलाच्या डाव्या हाताला पोहोचलो.  काल ज्या धर्मशाळेत मी उतरलो होतो तिथल्या मॅनेजर काकांनी मला आधीच घाबरवुन सोडले होते. पहाटे लवकर निघू नका, वाटेत जंगले प्राणी असतात. त्यामुळे मी पहाटे तीनच्या ऐवजी पाच ला निघालो आणि सकाळी सात वाजले तरी त्या दोघांनी मला जंगली प्राण्यांची भीती घालून  आणखीन घाबरून सोडले. तरीही मनाचा हिय्या करून मी पुढे चालत राहिलो. समोरून चालत आलेली एक दोन माणसे मागे गेली.   रेल्वे क्रॉसिंग करून पलिकडे गेल्यानंतर वनखात्याचे चेकपोस्ट दिसले. त्यांच्याकडे चौकशी करता ते म्हणाले की, रात्री पुलाखालून प्राण्यांची ये-जा असते आणि आता तर सकाळ झाली त्यामुळे आता प्राणी येत नाहीत. फुकट दोन तास उशीर निघालो, त्यामुळे उन्हात चालावे लागणार होते. कपाळावर हात मारला आणि चालू लागलो. पुलावरून सोडून गेलो असतो तर परवडले असते, इतका वेळ या सगळ्यात गेला होता.

 पुढे रस्त्यात ठिकठिकाणी बोर्ड लावले होते. मोतीचूर रेंज, राजाजी टायगर रिझर्व.  प्राणी रस्ता ओलांडतात, प्राणी रस्त्यात येऊ शकतात, गाडीतून उतरून नका.  हे मी घरी सांगितले असते तर घरच्यांनी मला सकाळी सातच्या आत बाहेर पडू नको सल्ला दिला असता. पण मी निघून इथे येईपर्यंत जवळजवळ दोन तास गेले होते व लक्ख उजाडले होते. 

ऊन वाढू लागले होते मी रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला गेलो. आता माझ्या समोरून वाहने येत होती. या बाजूला थोडी झाडी असल्यामुळे थेट ऊन अंगावर येत नव्हते. काही सोनचाफ्याची तर काही अनोळखी झाडे होती. चालताना झाडांची महत्त्व कळते. कितीही कडेने चालले तरी वाहने अगदी शेजारून जात होती. एकूणच पादचाऱ्यांना शून्य किंमत असते.

वाटेत काली कमलीवाले बाबा यांची मोठी गोशाळा लागली. मोठे आवार, सुसज्ज व्यवस्था, खूप गोधन होते. उत्तराखंड मध्ये काली कमलीवाले बाबा यांचे अनेक ठिकाणी आश्रम आहेत. बाहेरच्या मानाने तेथे माफक दरात निवासाची सोय होते.

 सावलीमुळे चालणे थोडे सुसह्य झाले. पण  ऊन लागायला लागल्यामुळे  तहान लागून सारखे पाणी प्यावे असे वाटत होते. सुरुवातीला पाणी   प्यायलो,नंतर ज्यूस, उसाचा रस, शहाळे असे करत करत वाटचाल चालू होती. दहा वाजता हायवेवर लावलेली आडवी पाटी दिसली... ऋषिकेश पाच किलोमीटर !!!  एक तासात आश्रमात पोहोचू असा विचार केला. गुगल मॅप उघडून स्वामी रामानंद आश्रमाचा पत्ता टाकला तर तो दोन तास पंधरा मिनिटे ची वेळ दाखवत होता.  चुपचाप गुगल मॅप बंद केले आणि पाय उचलले. 

थोडे पुढे गेल्यानंतर एक स्थानिक नागरिक भेटला. त्याला आश्रमाचा पत्ता विचारलं तर त्यांनी मला नीट पत्ता सांगितला तो म्हणाला पुढे गेल्यानंतर  चंद्रभागा ( एक क्षण नाव ऐकून मला आश्चर्य वाटले ) पूल लागेल. तो पूल ओलांडला की उजव्या हाताला वळा आणि मग विचारत विचारत पुढे जा. आश्रम खूप लांब आहे. तुम्हाला रिक्षाने जावे लागेल.  त्यावर मी हरिद्वार पासून चालत आलोय सांगितल्यानंतर तो चकित झाला. पण तरीही आश्रम खूप लांब आहे हे सांगणे त्यांनी मात्र सोडले नाही. नंतर माझी चौकशी केली, तुम्ही कुठून आलात कशासाठी चालत आलात  वगैरे विचारले माहिती दिल्यानंतर शुभेच्छा देऊन तो त्याच्या वाटेने, तर मी माझ्या वाटेने निघालो. सासूबाई आणि सासरे यांना वाटचालीची माहिती कळविली. त्यांचे आशीर्वाद होतेच. त्यांनी चार धाम यात्रेसाठी त्यांचा सहभाग व शुभेच्छा म्हणून आर्थिक वाटा उचलला. माझ्या या पूण्यकर्मात सर्वांचा वाटा होताच. एकट्याने सगळे थोडेच होते. 

चालताना उजव्या हाताला बहात्तर सीडी नावाचा घाट नावाचा घाट लागला. त्यावर मंदिर गंगेश्वर बजरंग महादेव अशी पाटी होती.  येथून खाली डोकावल्यावर ऋषिकेश च्या गंगेचे प्रथम दर्शन झाले. दोन मिनिटं उभा राहिलो, फोटो काढले आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. ऋषिकेशमध्ये चौकशी करीत रामानंद आश्रमात पोहोचलो. माझे बुलढाण्याचे एक मित्र श्री सुनील वायाळ यांनी त्यांच्या नातेवाईकां मार्फत सदर आश्रमात राहायची सोय केली होती. रजनीकांत, नरेंद्र मोदी हे स्वामी रामानंद यांचे शिष्य. मला पण आपण सेलिब्रिटी झाल्याचा फील आला...

श्री अशोक वायाळ यांची भेट घ्यायची होती.
आश्रमात प्रवेश करून त्यांची चौकशी केली तर ते समोरच उभे. नमस्कार केला. समक्ष भेट आज प्रथमच झाली होती. काल फोन करून मी उद्या १२-१ वाजेपर्यंत पोहोचतो आहे, असे कळवले होते. श्री अशोक वायाळ यांचे वडील ऋषिकेश ला संस्कृत शिक्षणासाठी. त्यांनी पुढे पीएचडी केली व येथेच स्थायिक झाले. स्वामी रामानंद तसेच त्यांचे उत्तराधिकारी  विद्यमान स्वामीजीं
यांचे ते अगदी निकटचे सहकारी आहेत. त्यांना अनेक भारतीय भाषा अस्खलितपणे बोलता येतात. अतिशय उमदा माणूस व प्रभावी व्यक्तिमत्त्व. तुम्ही कितीही दिवस राहा, काळजी करू नका असे त्यांनी मला अनेकदा सांगितले.
ऋणानुबंध म्हणायचे...त्यांचा टूर्स आणि ट्रॅव्हल्स चा व्यवसाय आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा यात्रेकरूंची गर्दी लोटली होती. सगळी लाॅजेस, आश्रम, धर्मशाळा ओव्हरफुल झाली होती. त्यांना कामामुळे उसंत नव्हती.

दुपारचे १२.३० झाले होते. आश्रमाची जेवणाची वेळ झाली होती. घंटा वाजली. आम्ही भोजनासाठी गेलो. सगळा शिस्तबद्ध कारभार...
तांदळाची खीर, मेदू वडे, सांबार, कारल्याची भाजी व ताक... भरगच्च मेन्यू.
हवे तेवढे घ्या, फक्त टाकू नका. जेवण झाल्यावर स्वतः चे ताट, चमचे, भांडे स्वतः स्वच्छ धुवून ठेवायचे. चांगला नियम व शिस्त.

आश्रमात बरेच विद्यार्थी आढळले. यातील काही लहान तर काही प्रौढ ही होते. तीन वर्षांचे वैदिक व उच्च शिक्षण येथे देतात. तरूण संन्याशी ही येथे बरेच आहेत. सायंकाळी तांदळाची खिचडी,कढी, रस्सा भाजी व पोळी असा मेन्यू होता.

या आश्रमात सर्वांना सरसकट प्रवेश मिळत नाही. अनुयायी, शिष्य, विद्यार्थी यांनाच प्रवेश दिला जातो. आश्रम खूप मोठा, स्वच्छ ठेवलेला परिसर असा आहे. शंकराचे मंदिर, स्वामीजींचे समाधी स्थान,यज्ञ शाळा, पाहुण्यांसाठी सुसज्ज व वातानुकूलित खोल्या. मोठे भोजन गृह. पार्किंगसाठी भरपूर जागा.

आश्रमाच्या मागील बाजूस गंगा वाहात असते. त्यावर बांधलेला घाट. सायंकाळी मनोहारी वातावरण असते. लोक पायऱ्यांवर येऊन बसतात. कोणी एकटा येतो, तर कोणी सहकुटुंब.
कोणी ध्यानात मग्न तर कोणी मित्र मैत्रिणींशी हितगुज करण्यात मशगुल. कोणी आरती करून दिले पाण्यात सोडतो तर कोणी पाण्यात पाय सोडून विचारात हरवलेला... कोणी पाण्यात खेळत असतात तर कोणी दुरूनच गंगामैय्याला डोळ्यात साठवत असतात...घाटाच्या पायऱ्यांवर बांधलेल्या रस्त्यावर व्यायाम करणारे, सन्याशांची ये-जा चालू असते...बऱ्याच वृद्धांची मनिषा सफल झाल्याची भावना.

 संध्याछाया पसरत असतात, समोर गंगामैय्या संथपणे वाहात असते, कोणीतरी आरती करून सोडलेले दिवे हेलकावे खात पुढे जात असतात, मधूनच एखादा मासा पाण्यावर उडी मारून क्षणात पाण्यात लुप्त होतो, मासे आपल्याशी लपाछपी खेळत असतात... प्रत्येक आश्रमाच्या गंगारती होतात. हा छोटेखानी सोहळा असतो.
चटई पसरून बसलेले भाविक. मंत्र म्हणणारे विद्यार्थी, दीपमाळेला लावलेल्या वाती...उदबत्तीचा सुगंध, वातींचा धूर...

हळूहळू काळोख आपले बाहू पसरतो. उरल्या सुरल्या संधीप्रकाशाला कवेत घेतो. लोक घरी परतू लागतात... मागे उरतो गंगामैय्याचा आवाज, दूरवर दिसणारे मंदिराचे दिवे, साधनामस्तांसाठी उत्तम वेळ... कालचक्र आहे हे...न थांबणारे.
मर्त्य मानव, आज असणारे उद्या नाहीत... निसर्ग मात्र तोच आहे...

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*
*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - ३*


ऋषिकेश होऊन पुढे निघालो. पहाटे पावणे चार वाजता रामानंद आश्रम सोडला. गल्लीबोळातून चालत असताना, १-२ श्वान अंगावर धावून आले. मी शांतपणे चालत राहिलो. मी निरुपद्रवी आहे हे लक्षात आल्यावर ते शांत झाले.  वाटेत एक-दोन रिक्षाचालक ग्राहकांची वाट पहात बसले होते.  गुगल बाबा की जय. तो दाखवत असलेल्या रस्त्यावरून गंगा किनार्‍यावरुन चाललो होतो. दूरवर कुठेतरी श्वानांचा आवाज येत होता. किनाऱ्यावरून चालताना  उजव्या हाताला गंगामैयाचा खळखळ आवाज शांततेत जाणवणारा. तर डाव्या हाताला आश्रम, हॉटेल, लॉजेस. उजव्या हाताला *जानकी सेतू*, पादचारी आणि दुचाकींसाठी बांधलेला. अंधारात त्याच्यावरील दिवे लक्ष वेधून घेत होते. बसण्यासाठी बांधलेल्या तसेच गंगा किनारी काही यात्रेकरू उघड्यावर झोपले होते. पहाटेच्या वेळी रस्त्यावर मी एकटाच.

रामानंद आश्रम मनाला भावला.  दिखाऊपणा नाही, भपका नाही‌.  तेथे राहण्याचा योग आला. वेळ आली राहिलो, आनंद घेतला, निघालो... आपल्या सर्वांना नदी, नाले, झरे, वारा यांच्यासारखे वाहते राहता यायला पाहिजे.  वाहणारे पाणी स्वच्छ राहते. मनाला भावते.  रोगराई होत नाही. बंद खोलीतील हवा कुबट होते. तसेच माणसाने सुद्धा सतत वाहते राहायला पाहिजे. याचा अर्थ संसार सोडून संन्यासी व्हावे असे नाही.  तर घराबाहेर पडून प्रवास 
करण्याऐवजी शरिराचे चोचले पुरवणाऱ्या ठिकाणी थांबून, अडकून पडू नये. नाहीतर एक प्रपंच सोडायचा आणि दुसरा तयार करायचा असे होते.  हे लक्षात येत नाही, हे खरे.
चरैवेति चरैवेति...
चालत राहा... चालत राहा...

चालताना वाटेत पेड पार्किंग बाहेर बसलेल्या दोघांना नरेंद्र नगर चा रस्ता विचारला. त्यांनी दाखवलेल्या दिशेने चालू लागलो.  त्यातला एक जण म्हणाला बाबूजी नरेंद्रनगर तो यहा से बहुत दूर है टॅक्सी करनी पडेगी.  मी ठिक आहे असे म्हणालो आणि पाऊल उचलले. पुढे चढाचा रस्ता लागला.  गुगल बाबांनी जिथे वळायला सांगितले होते तिथे रस्त्यावर पाणी जाण्यासाठी चारी बांधली होती आणि त्याच्या मागे जंगलात जाणारी पायवाट दिसत होती. गुगल बंद केले व तसाच पुढे चालत राहिलो. रस्त्यावर विचारायला कोणी नव्हते.  पुढे गेल्यावर हायवेवर पाटी लागली नरेंद्र नगर.  डाव्या हाताला वळलो. आपले लक्ष नरेंद्रनगर होते.  इथून पुढे चढाचा रस्ता... घाट... घाट आणि घाट.  हिमालयात जाण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. समोरून मागून वाहने चालली होती. अर्धा तास चालल्यानंतर एका ठिकाणी तीन रस्ते येऊन मिळाले होते. तेथे पोलिसांनी पुढे जाणारा रस्ता बंद केला होता.  चौकशी केल्यावर पुढे दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होता व राडारोडा उचलून रस्ता क्लिअर करण्याचे काम चालू होते. त्यामुळे रस्ता बंद केल्याचे त्यांनी सांगितले. थांबलेल्या वाहनातील, रात्रभर प्रवास करून आलेले प्रवासी बराच वेळ वाहन थांबून ठेवल्यामुळे त्रस्त होऊन गाडीतून खाली उतरून येरझाऱ्या मारत होते. पोलीस चेक पोस्ट शेजारीच काली मातेचे मंदिर होते. सकाळच्या शांततेत कोणीतरी घंटा वाजवली त्याचा आवाज निरव शांततेत छान घुमला. मी चालत चाललो आहे, असे सांगितल्याने मला पुढे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली.पोलिसांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी पुढे निघालो.


 माझ्यासोबत एका हातात काठी व एका हातात पाण्याचा कॅन घेऊन एक जेष्ठ नागरिक पुढे चालले होते. झप झप  चालून त्यांना गाठले आणि चौकशी केली.  त्यावर त्यांनी मी व्यायामाला चाललो असून त्यांचे नाव केपीएस नेगी असे त्यांनी सांगितले . हातातला कॅन,  लावलेल्या झाडाला पाणी घालण्यासाठी घेऊन जात आहे असे ते म्हणाले नेगी हे आडनाव ऐकल्यावर मला पूर्वी भारतीय हॉकी संघात असलेल्या मीर रंजन नेगी या गोलकीपर ची आठवण झाली. चालताना ते हातातील काठी रेलींगवर आपटत आवाज करत चालले होते. याचे कारण विचारले असता रात्री रस्त्यावर हत्ती येतात‌. त्यांना पळवण्यासाठी मी काठीचा रेलींगवर आवाज करतो असे त्यांनी सांगितले. ऐकून माझी दातखीळ बसली.
काठीच्या आवाजाने बाकी जंगली पशु पळून जातात. पण हत्ती मात्र जाम हलत नाही. तो ठाम उभा राहतो व प्रसंगी अंगावर धावून येतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली.  हे गृहस्थ दहा मिनिटात परत जाणार होते. पुढे अंधारात घाट रस्त्यावर जंगलातून मला एकट्यानेच प्रवास करायचा होता. सगळाच उत्तराखंडाच्या घाट रस्ता जंगलाचा आणि प्राणी असलेला असा आहे.
हा प्रसंग माझ्यावर आला असता तर सामान टाकून पळून जाण्याशिवाय माझ्या हातात दुसरे काही नव्हते.  बघू या. गुरुदेव दत्त म्हणालो, जे येईल त्याला सामोरे जाण्याचे ठरवले आणि मी रेलींगवर काठी आपटत पुढे निघालो‌.

नरेंद्र नगर, हिंडोलाखाल, दुवाधार, आगराखाल, फकोट, बेमुंडा, खाडी, नांगणी, चंबा ही रस्त्यातील काही गावांची नावं.  गूगल बाबांनी दाखवलेल्या दोन गावाच्या मधील अंतर आणि प्रत्यक्षात अंतर यात फरक असल्याचे लक्षात आले. चंबाला नाष्टा केला चहा पिताना टपरीवाल्याशी बोलताना तो म्हणाला की, येथून गंगोत्री दोनशे किलोमीटर आहे. नवीन धरण बांधल्यामुळे आधीचा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे गंगोत्रीला जाताना तीस ते पस्तीस किलोमीटरचा फेरा पडतोय व त्यामुळे अंतर वाढले आहे अशी माहिती त्यांनी टपरी चालकाने मला पुरवली.

उत्तराखंड म्हणजे डोंगरी भाग. गंगोत्रीला जाताना जास्त चढ उतार कमी.  या राज्यात अनेक डोंगर रांगा आहेत.  येथील सर्वात मोठे शिखर नंदादेवी. आपण सुरुवात करतो छोट्या डोंगरातून पुढे हळूहळू गगनचुंबी सुळके स्वागतासाठी उभे असतात. त्यानंतर हळूहळू दिसू लागतात बर्फाच्छादित डोंगर आणि त्यांच्या अंगावर वाढलेले सूचिपर्णी वृक्ष. 

या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO ) आणि स्थानिक प्रशासन यांचे रस्ता बांधणी व  देखभाल आणि दुरुस्ती यांचे काम ३६५ दिवस चालूच असते. कोसळलेल्या दरडी उचलणे, रस्ता मोकळा करणे, वाहून गेलेला रस्ता पुन्हा नीट करणे, पूल दुरुस्त करणे,  कोसळण्याची शक्यता असलेल्या दरडी उतरवणे अशी अनेक कामे ते अविश्रांत करत असतात. सर्व रस्त्यावर जागोजागी पाट्या लावलेल्या दिसून येतात येथे थांबू नका, वाहन उभे करू नका, दरड कोसळण्याची शक्यता इत्यादी... वाटेत एका ट्रकचा मागचा ॲक्सल तुटून , मागील दोन चाके वेगळी झाली होती. 

प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची धडपड चालू आहे. जसे जसे आपण पहाडी भागात आत जातो तसे तसे सर्व गोष्टींचे परिमाण बदलत जातात उपलब्ध साधन संपत्ती, सुविधा या कमी होत जातात.  या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा आहे. सर्व भार खाजगी वाहतूक व्यवस्थेवर सोपवलेले दिसतो. सहाजिकच नफेखोरीसाठी जास्त प्रवासी भरून वाहने निघणे यावर कंत्राटदारांचा भर असतो. पंचवीस क्षमतेच्या बसमध्ये ४५ लोक भरले जातात. हात दाखवल्यावर वाहन उभे राहते. भाजीपाला, दूध, फळे, किराणामाल दूरवरून आणावा लागतो.
१०० किलोमीटरच्या परिसरात एखादे कॉलेज. इंजीनियरिंग कॉलेज राज्याच्या मुख्यालयामध्ये म्हणजे डेहराडूनला. आरोग्य सेवांची व्यवस्था तर विचारूच नका. जिल्हा आरोग्य केंद्रांमध्ये एक पुरुष व एक महिला डॉक्टर. तेच सर्व आजारांवर उपचार करणार. बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्यास पेशंटला सुरक्षित रुग्णालयात हलवे पर्यंत रुग्ण दगावणावरच. एकट्या पुणे शहरात ७० हून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत असे समजते. आपला आदिवासी भाग व येथील दुर्गम डोंगरी भाग यात फार फरक नाही. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी पण आदिवासी आणि डोंगरी लोक अजून दुर्लक्षितच आहेत असे खेदाने नमूद करावेसे वाटते. दोन वर्षांच्या कोव्हिडच्या कालावधीत इथे काय परिस्थिती झाली आहे याचा आपण अंदाज तरी बांधला आहे का ?

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

कोकण पर्यटन

फिरायला जायचं आहे तर उत्तम पर्याय आहेत कोकणातील पर्यटन स्थळे - Places To Visit In Konkan
फिरायला जाण्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळी ठिकाणं असतात. पण बऱ्याचदा प्लॅन केला जातो तो कोकणात फिरायला जायचा. कोकणातील पर्यटन स्थळे अनेक आहेत. कोकण सहल काढणं म्हणजे खरं तर एक मजा. कोकण पर्यटन स्थळे नक्की कोणती, तिथे कसं जायचं, कुठे फिरायचं असा प्रश्नही पडतो. कोकण दर्शन माहिती मराठी मध्ये आपल्याला नेहमीच जाणून घ्यायला आवडते. कोकण हा खरं तर महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया असे नेहमीच म्हटले गेले आहे. इथले समुद्रकिनारे, शुद्ध हवा, परिसर, हिरवळ या सगळ्याने मन प्रसन्न होऊन जाते. इतकंच नाही तब्बेतही चांगली होते. इथली हवाच निराळी आहे. त्यामुळे रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून सुटका हवी असेल तर कोकण सहल ही किमान एकदा तरी करायला हवी. तुमचं कोकणात घर असेल तर मग मजाच आहे. पण जर घर नसेल आणि तुम्हाला कोकणात फिरायला जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट द्यायला हवी जी आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. कोकणात खरं तर अनेक ठिकाणं फिरण्यासारखी आहेत. काही प्रसिद्ध आहेत तर काही प्रसिद्ध नाहीत तरीही सुंदर आहेत जिथे किमान एकदा जाऊन तरी तुम्ही भेट द्यायला हवी. पाहूया कोणती आहेत ही ठिकाणं.

कशेळी, कनकादित्य मंदिर (Kankaditya Mandir)

रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी हे लहानंसं गाव आहे. अजूनही इथे मातीचे रस्ते आणि कोकणातील शुद्ध आणि स्वच्छ वातावरण जपलं गेलं आहे. गावची वस्ती तशी जास्त नाही. पण या गावात दोन मंदिर आहेत. त्यापैकी एक लक्ष्मीनारायण मंदिर आणि एक आहे ते कनकादित्य मंदिर. सूर्याची केवळ सात मंदिरे संपूर्ण भारतामध्ये आहेत आणि त्यापैकी एक मंदिर आहे ते म्हणजे कनकादित्याचं मंदिर. हे मंदिर कसं निर्माण झालं याचीही एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. एक गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलले नाही. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणाने कनकेला म्हनाले की तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने ही गोष्ट त्यावेळी ग्रामस्थांना सांगितली मग ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्य मूर्ती गावात आणून स्थापना केली. त्या कनकाबाई मुळे घडले त्यामुळे कनकेचा आदित्य म्हनून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले.

कसे पोचावे - रत्नागिरी पर्यंत ट्रेन आणि त्यानंतर रिक्षा अथवा एस. टी. , राजापूरपासून धारतळे आणि मग आडिवरे अशी एस. टी.

वैशिष्ट्य - रथसप्तमी उत्सव पाच दिवस चालणारा हा उत्सव कशेळी आणि आजूबाजूच्या गावासाठी महत्त्वाचा काळ असतो. या उत्सवात कनकादित्य आणि कालिकादेवी यांचे होणारे लग्न हा सर्वांसाठीच आवर्जून बघण्याचा लग्नसोहळा असतो. कनकादित्या मंदिरामध्ये साधारण 850 वर्षांपूर्वीचा ताम्रपटही आहे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 3000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

आडिवरे, महाकाली मंदिर (Adivare Mahakali)
कशेळी गावापुढील गाव असणारे आडिवरे हे तेथील महाकाली मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. इथे कायम भक्तांची रांग असते. पण कितीही गर्दी असली तरीही इथे अतिशय प्रसन्न वाटते आणि त्याशिवाय शांतताही असते. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा तीन देवी अनेकांच्या कुलदेवता आहेत. त्यापैकी महाकाली ही कुलदेवता या ठिकाणी आहे. इसवी सनाच्या ९व्या शतकात भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करुणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टान्त दिला आणि मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर असे सांगितले. त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील महाकालीची मूर्ती सापडली आणि त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा "वाडापेठ" येथे देवीची स्थापना केली अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. महाकाली देवी अनेकांना प्रसन्न होते असंही म्हटलं जातं. 

कसे पोचावे - रत्नागिरी पर्यंत ट्रेन आणि त्यानंतर रिक्षा अथवा एस. टी
वैशिष्ट्य - अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये महाकाली मंदिरात यात्रा भरते. या यात्रेसाठी खूपच गर्दी होते. उत्सव काळात देवीला वस्त्रालंकारांनी नटवले जाते. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा पालखी सोहळा म्हणजे एक विहंगम दृष्यं असते. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 3000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

तारकर्ली (Tarkarli Beach)
कोकणात आल्यानंतर सर्वात जास्त ओढ असते ती समुद्रकिनाऱ्याची आणि आता कोकणामध्ये तारकर्लीचा समुद्रकिनारा हा खूपच प्रसिद्ध झाला आहे. कारण आता या समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग आणि अन्य अॅक्टिव्हिटीही सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणामधील सर्वच समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ आहेत आणि त्यामध्ये तारकर्लीचा समुद्रकिनारा हा पुढे आहे असं म्हटलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनही आहेत आणि त्यांना बघण्यासाठीही अनेक जण कोकण सहल काढताना तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्याला मुद्दाम भेट देतात. 

कसे पोचावे - कुडाळ स्टेशनला उतरून रिक्षा अथवा एस. टी. अथवा स्वतःची गाडी 

वैशिष्ट्य - तारकर्लीचा समुद्रकिनारा हा त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. इतकंच नाही  इथलं पाणी अतिशय स्वच्छ आहे. दिवसा साधारण 20 फूट खोलीपर्यंत तुम्ही डोळ्याने स्वच्छ पाणी पाहू शकता इतकी स्वच्छता या पाण्यामध्ये आहे. त्याशिवाय आजूबाजूला असणारा नयनरम्य निसर्ग हा तुमचा थकवा कुठच्या कुठे पळवून लावतो. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 3 दिवस (प्रति व्यक्ती)

मुरूड - जंजिरा (Murud Janjira)

अलिबागमधील मुरूड - जंजिरा हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण. अलिबाग हा कोकणचा एक भाग असून याठिकाणी अनेक समुद्रकिनारे आहेत. इथल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या कोकणच्या भागात नेहमीच सहल काढण्यात येते.  शिवाय कोकण पर्यटन स्थळे म्हणून अलिबागमधील अनेक स्थळं प्रसिद्ध आहेत. त्यापैकी मुरूड-जंजिराला तर इतिहास लाभला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला असा होतो. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आणि त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. आजही हा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. 

कसे पोचावे - गेट वे ऑफ इंडियावरून लाँच अलिबागपर्यंत. अलिबाग ते मुरूड जंजिरा एस. टी. अथवा रिक्षा 

वैशिष्ट्य - इतिहासप्रेमी आणि किल्लाप्रेमींंसाठी मुरूड - जंजिरा किल्ला ही पर्वणीच आहे. याचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आपोआपच अभिमान जागृत होतो. या किल्ल्याची तटबंदी ही बुलंद आहे आणि  हेच याचे वैशिष्ट्य आहे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)



रत्नदुर्ग किल्ला (Ratnadurga Fort)
रत्नदुर्ग किल्ला 

रत्नागिरीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटर वर असणारा हा रत्नदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे असलेले भगवती मंदिर. समुद्रापर्यंत इथे भुयारी मार्ग जातो. इथे येणारे प्रत्येक पर्यटक हे इथल्या विहंगम दृष्यामुळे मोहून जातात. हा किल्ला समुद्राच्या काठावरील असणाऱ्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या पाथथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. 

कसे पोचावे - रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच भगवतीचे शिवकालीन मंदिर अतिशय सुबकरित्या बांधण्यात आले आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते जिथे  तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे. आता हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट ज्याठिकाणी होतो तेथे असलेली प्रचंड गुहा स्पष्ट दिसते.

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

श्रीवर्धन (Shrivardhan Beach)
श्रीवर्धनचा प्रसिद्ध समुद्रकिनारा

अतिशय शांत आणि रम्य असणारा हा समुद्रकिनाराही त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला फेसाळ लाटांमध्ये फिरायला खूपच मजा येते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. इथून दिसणारा सूर्यास्त हा अप्रतिम असतो. अर्थात सर्वच समुद्रकिनाऱ्यांवरून सूर्यास्त चांगला दिसतो पण श्रीवर्धन किनाऱ्यावरून समुद्राच्या काठावरून पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. श्रीवर्धनमधील लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णुमूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातील असावी असा अंदाज आहे. 

कसे पोचावे - मुंबईवरून एस. टी., बस 

वैशिष्ट्य - श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर २००-२५० वर्षांपूर्वीचे आहे. अगस्ती मुनींनी याची स्थापना केली, असे मानले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. येथील कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारख्या आहेत असे सांगितले जाते. कोकण पर्यटन करायचे असेल तर श्रीवर्धनला भेट दिलीच पाहिजे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 6000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

धुतपापेश्वर (Dhutpapeshwar)
धुतपापेश्वर मंदिर

शांत आणि डोंगराच्या मधोमध असणारं हे काळ्या पाषाणातील शिवलिंग असणारं निसर्गाचं अप्रतिम ठिकाण. पेशवेकालीन बांधकाम या मंदिरात असून इथे लाकडात खूपच आकर्षक काम करण्यात आलं आहे. यावर अनेक कलाकुसरी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत. हे मंदिर पुरातन असून सहसा पावसाळ्याच्या दिवसात येथील धबधबा बघण्यासाठी अनेक पर्यटक जातात. इथे शंकराचे असलेले मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा अतिशय नयनरम्य आणि मनोहारी आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे कोकणातील भटकंतीचा आणि दाट वनराईचा आणि वळणाच्या रस्त्यांचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर इथे नक्की भेट द्यायला हवी.  

कसे पोचावे - रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - पताक्यांचा वापर करून तयार करण्यात आलेले शिवलिंग हे येथील वैशिष्ट्य आहे. हे शिवलिंग खूपच मोठे असून अतिशय आकर्षक आहे. महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी खूपच मोठा उत्सव होतो जिथे आजूबाजूच्या गावातील अनेक लोक दर्शनाला येतात. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

महाशिवरात्र - महाराष्ट्रातील कोणती आहेत खास प्राचीन शिवाची मंदिरे

थिबा राजवाडा (Thiba Palace)
थिबा राजाचा राजवाडा 

कोकणात फिरण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांपासून ते राजवाड्यापर्यंत सर्व काही आहे. कोकणाला एक इतिहास लाभला आहे. त्यापैकीच एक स्थळ म्हणजे थिबा राजवाडा. रत्नागिरीमध्ये हा थिबा राजवाडा असून यामध्ये एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. आताचे म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रम्हदेशाच्या थिबा मिन राजाला येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. थिबाने वापरलेल्या अनेक गोष्टी येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. हा राजवाडा त्याकाळी ब्रिटिशांनी बांधला असून आता पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 

कसे पोचावे -  रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - थिबा राजा आणि राणी हे दोघेही या राजवाड्यात राहात होते आणि त्यांनी वापरलेल्या अनेक गोष्टी इथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्या पाहण्यासाठी कोकण सहल काढून अनेक पर्यटक इथे येत असतात. त्याशिवाय कोकणातील पर्यटन स्थळे म्हटली की थिबा राजवाड्याचं नाव आलं नाही असं होत नाही. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 4000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

लोकमान्य टिळक घर (Lokmanya Tilak House)
लोकमान्य टिळकांचं घर

लोकमान्य टिळक हे व्यक्तिमत्व मराठी माणसाला माहीत नाही असा एकही माणूस सापडणार नाही. लोकमान्य टिळकांचे घर हे रत्नागिरीत आहे. आजही अनेक पर्यटकांसाठी हे घर उघडे आहे. कोकण सहल काढणार असाल तर तुम्ही लोकमान्य टिळकांचं हे घर पाहायलाच हवं. रत्नागिरी शहरातील टिळक आळीतमध्ये टिळकांचं टुमदार घर आजही तसंच आहे. साधारण दहा वर्षे टिळक याच घरामध्ये राहात होते. हे घर महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याने जतन केले असून स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे घर पाहिल्यानंतर टिळकांबद्दलचा अभिमान अधिक दाटून येतो हे नक्की. 

कसे पोचावे - रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - स्वातंत्रसंग्रामातील लोकमान्य टिळक यांनी दिलेले योगदान खूपच मोठे आहे. या घरात त्याच्या स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत. आपल्यालाही या आठवणींनी एक स्फूर्ती मिळते. सोमवार वगळता इतर सर्व दिवशी तुम्हाला इथे जाऊन नक्की भेट देता येईल. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 4000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

रायगड किल्ला (Raigad Fort)
शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला 

महाराष्ट्रीची शान रायगड किल्ला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा भाग कोकण पट्ट्यात येतो.  रायगडमध्ये अनेक डोंगर किल्ले आणि समुद्रकिनारे आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातील राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला हा तर कोकण पर्यटकांसाठी पर्वणी आहे. रायगड किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे. त्याशिवाय हा किल्ला फिरण्यासाठीही खूपच मोठा आहे. इतक्या वर्षांनंतरही रायगड किल्ल्याची शान महाराष्ट्राने जपून ठेवली आहे. दरवर्षी शिवाजी महाराजांच्या जयंतीला इथे मोठा सोहळा साजरा करण्यात येतो. 

कसे पोचावे - गाडी, बस 

वैशिष्ट्य - किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. मराठी इतिहासामध्ये या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवराज्याभिषेक हा सर्वात मोठा अनुभव या किल्ल्याने अनुभवला आहे. या किल्ल्यामध्ये शिवरायांनी सर्वात जास्त वास्तव्य केले असे सांगितले जाते. या किल्ल्यावर जिजाबाईंचा वाडा, खुबलढा बुरूज,  नाना दरवाजा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्तीतलाव, स्तंभ, मेणा दरवाजा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, टकमक टोक, हिरकणी टोक इतक्या सगळ्या भारावलेल्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 2000 आणि 1 दिवस (प्रति व्यक्ती)

किहिम समुद्रकिनारा (Kihim Beach, Alibaug)
किहिम समुद्रकिनारा 

अलिबागमध्येच असणारा हा कोकणातील स्वच्छ आणि सुंदर असा किहीमचा समुद्रकिनारा. सरखल कान्होजी आंग्रे यांच्या अखत्यारीत किहिम समुद्रकिनारा अधिक प्रसिद्ध झाला. शिवरायांच्या काळात नौदलासाठी हा समुद्रकिनारा महत्त्वाचा मानण्यात आला होता. आता या समुद्रकिनाऱ्यावर अनेक पर्यटक फिरायला येतात. इथली पांढरी आणि मऊशार वाळू फिरण्यासाठी अधिक छान भासते.

कसे पोचावे - गेट वे ऑफ इंडियावरून लाँचने अलिबाग आणि तिथून रिक्षा वा बस 

वैशिष्ट्य - या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू ही अतिशय मऊ आणि पांढरी आहे. त्याशिवाय इथे कोणत्याही प्रकारची घाण तुम्हाला दिसून येत नाही.  दोन दिवसात पटकन फिरून येता येते. इथली हवा शुद्ध असल्याने रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाटते. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

गणपतीपुळे (Ganpatipule)

गणपतीपुळेला इतिहास लाभला आहे. कोकण म्हणजे गणपतीपुळे असं एक गणितच होऊन गेलं आहे. साधारण 1600 वर्षांपूर्वी समुद्रकिनाऱ्यावर निर्माण झालेलं हे स्वयंभू गणपतीमंदीर येथील वैशिष्ट्य आहे. याचं पश्चिम द्वार असल्यामुळे हे याचं वैशिष्ट्य ठरतं. हा समुद्रकिनारा खूपच सुंदर असून गणपतीचं मंदीर असल्यामुळे याला पवित्र ठिकाण मानलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू ही पांढरी असल्यामुळेच याला गणपतीपुळे असं नाव देण्यात आलं आहे. 

कसे पोचावे - मुंबई सेंट्रलवरून एस. टी., ट्रेन,  स्वतःची गाडी 

वैशिष्ट्य - गणपतीपुळेला गणपतीचं पुरातन मंदिर तर आहेच. पण आता या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने हॉर्स रायडिंग, बोटिंग असे पर्यायही उपलब्ध आहेत. त्याशिवाय जवळच असणारा जयगड किल्लाही पाहण्यासारखा आहे.

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

आरे वारे समुद्रकिनारा (Are-Ware)

रत्नागिरीच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांपैकी असणारा आरे वारे बीच हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे. आरे वारे हा आता कोकणात सहल काढण्यासाठी उत्तम पर्याय झाला आहे. इथे मनाला मिळणारी शांतता आणि मुळात असणारा स्वच्छपणा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये समुद्र असा मनमोहक निसर्गाचा नजारा इथे पाहायला मिळतो. आरे वारेच्या समुद्रकिनाऱ्याला आता बरेच पर्यटक भेट देऊ लागले आहेत. 

कसे पोचावे - रत्नागिरीवरून रिक्षा अथवा एस. टी.  

वैशिष्ट्य - रत्नागिरीमध्ये असलेल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी सर्वात जास्त प्रसिद्ध असणारा आरे वारे हा समुद्रकिनारा आहे. आरे वारे हे दोन आजूबाजूला असणारे समुद्रकिनारे असून भौगोलिकदृष्ट्या आश्चर्य असणारे हे किनारे असल्याचं म्हटलं गेलं आहे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

हरिहरेश्वर (Harihareshwar)
चिंचोळे रस्ते, अजूनही शहरीकरण न झालेलं हरिहरेश्वर गाव आणि समुद्राची कानी पडणारी गाज. या गावात पोचताच इथलं साधेपणा तुम्हाला आपलासा वाटू लागतो. तसंही मुंबईकरांना गर्दीतून सुटका हवी असतेच. आता प्रत्येक घरात या सुट्ट्यांमध्ये कुठे जायचं याचं प्लॅनिंग झालं असेल किंवा सुरू असेल. दरवर्षी कुटुंबाला एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला नेणं जरा कठीणच आणि रिसोर्ट्स पिकनिक्सचाही कंटाळा आला असेल तर हरिहरेश्वरला नक्कीच भेट द्यायला हवी. 

कसे पोचावे - हरिहरेश्वर हे मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे माणगाव आहे. जे इथून जवळपास 60km अंतरावर आहे. एसटीच्या अनेक बसेस हरिहरेश्वरला जातात. तसंच तुम्ही खाजगी वाहनानेही इथे पोचू शकता. 

वैशिष्ट्य - हरिहरेश्वरमध्ये अजून जास्त हॉटेल्स नाहीत पण तुम्ही होम स्टेचा ऑप्शन घेऊ शकता. जो चांगला आणि स्वस्तही आहे. एमटीडीसीची इकडे कॉटेजेस आहेत. हरिहरेश्वराला कधीही वर्षभरात कधीही भेट देऊ शकता पण जास्त उन्हाळा असल्यास मात्र टाळा. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

दापोली (Dapoli)

कोकणच्या हृदयात वसलेलं निसर्गरम्य दापोली हे मुंबईपासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे. इथली पर्यटकांची गर्दी गेल्या काही वर्षात वाढली असली तरी अजूनही इथे पूर्णपणे व्यावसायिकीकरण झालेलं नाही. नेहमीच्या रूटीनपासून ब्रेक हवा असल्यास दापोलीला नक्कीच भेट देता येईल. याची मुख्य कारण म्हणजे इथले निसर्गाचं वरदान लाभलेले स्वच्छ आणि कमी गर्दी असलेले समुद्रकिनारे आणि सुट्टीमध्ये एन्जॉय करण्यासाठी मिळणारे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. 

कसे पोचावे - एस. टी. , बस, स्वतःची गाडी, ट्रेन 

वैशिष्ट्य - दापोली म्हणजे समुद्रकिनारे यात समावेश होतो तो केळशी, दाभोळ, बुरोंडी या किनारपट्टी भागाचा. येथील समुद्रकिनाऱ्यांमध्ये प्रसिध्द असलेले किनारे म्हणजे कर्दे बीच, केळशी बीच, मुरूड बीच, लाडघर बीच, कोळथरे बीच आणि तामस तीर्थ बीच. पर्यटकांची संख्या वाढूनही आजही इथले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत, हे विशेष. एवढंच नाहीतर इथल्या काही बीचवर तुम्हाला डॉल्फीन आणि वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करता येतील तर काही किनाऱ्यावर फक्त आणि फक्त तुम्हीच असाल एवढा निवांतपणा अनुभवता येईल.

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

प्रश्नोत्तरे
1. कोकणात जाण्याचा उत्तम कालावधी कोणता?

साधारण ऑक्टोबर ते मे या काळामध्ये तुम्ही कोकणात कधीही जाऊ शकता. आंब्याचा आस्वादा घ्यायचा असेल तर एप्रिल आणि मे महिना फिरण्यासाठी उत्तम काळ आहे. 

2. कोकणात सर्वात जास्त काय प्रसिद्ध आहे?

कोकणातील समुद्रकिनारे, आंबा, काजू, मंदिरे या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. सर्वात जास्त फिरण्याची ठिकाणं म्हणजे कोकणातील समुद्रकिनारे आणि पुरातन मंदिरे. 

3. पुण्यापासून कोकणात जायला साधारण किती वेळ लागतो?

पुण्यापासून कोकणात जायला साधारण 13-14 तास लागतात. पुण्यातून अनेक एस. टी. आहेत. त्याशिवाय आता अनेक ट्रेननेही प्रवास करता येतात. 

4. कोकणातील सर्वात चांगले समुद्रकिनारे कोणते?

गणपतीपुळे, भाट्याचे पुळण, आरे वारे, भोगवे,वेंगुर्ले, आचरा, चिवला,मालवण, तारकर्ली हे अतिशय प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. या ठिकाणी अतिशय स्वच्छ समुद्रकिनारे असून इथे फिरायला मजा येते. 

5. कोकणात पोहचायला मुंबईतून किती वेळ लागतो?

ट्रेनने कोकणात पोहचण्यासाठी साधारण 9 तास लागतात. तर बस अथवा एस. टी. ने कोकणातील काही भागामध्ये पोहचण्यासाठी 12 तास लागतात. 

6. कोकण पट्टा नक्की कोणता आहे?

रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मुंबई हा संपूर्ण कोकणपट्टा आहे. पण तरीही सर्वात जास्त पर्यटक हे रत्नागिरी आणि रायगड या ठिकाणी फिरायला जातात.

मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा 2020
परिस प्रकाशन आणि भटकंती एक्सप्रेस आयोजित राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेतील अंतिम फेरीतील काही फोटो youtube वर अपलोड  करण्यात आले आहेत. सर्व बांधवाना नम्र विनंती आहे की सर्व फोटो पाहून like आणि कमेंट करा. तसेच भटकंती एक्सप्रेस  चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भटकंती एक्सप्रेस फेसबुक पेजला देखील करा.
फोटोग्राफी स्पर्धेतील काही फोटोंच्या लिंक खालीलप्रमाणे आहेत.
11) राहुल सिरसेवाड
https://youtu.be/s88Gpr5PhS8
12) श्रीशैल जट्टे लोहारा, उस्मानाबाद
https://youtu.be/IY24McdANJo
13) स्वप्निल अशोकराव साळोखे कोल्हापूर 
https://youtu.be/wGNkn9RvhTs
14) अदिती टापसे. ठाणे.
https://youtu.be/uf-jX8vjLTc
15) मनोज पवार कुर्डुवाडी, सोलापूर.
https://youtu.be/Uw9-8Ur8G5g
 सतीश कोळपे सर लिखित भटकंती एक्सप्रेस हे पुस्तक मिळवाण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा. 
1. शंकर शिंदे, अकलूज, सोलापूर  9423039683
2. सतीश कोळपे, दौंड, पुणे,
9823426647
3. डॉ. दीपक ढोक, उमरखेड, यवतमाळ 7588188045
4.शिवशंकर राऊत वाशी,  उस्मानाबाद 9403705825
5. स्वप्नीलकुमार चव्हाण, सातारा  9763976897
प्रायोजक:- सतीश कोळपे, लेखक, भटकंती एक्सप्रेस.
आयोजक:- परिस प्रकाशन व भटकंती एक्सप्रेस परिवार.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙

राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा 2020

राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा 2020
परिस प्रकाशन आणि भटकंती एक्सप्रेस आयोजित राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेतील अंतिम फेरीतील काही फोटो youtube वर अपलोड  करण्यात आले आहेत. सर्व बांधवाना नम्र विनंती आहे की सर्व फोटो पाहून like आणि कमेंट करा. तसेच भटकंती एक्सप्रेस  चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भटकंती एक्सप्रेस फेसबुक पेजला देखील करा.
फोटोग्राफी स्पर्धेतील काही फोटोंच्या लिंक खालीलप्रमाणे आहेत.
6) गणेश जोशी बार्शी, सोलापूर.
https://youtu.be/E6fmZRHft6Y
7) संकेता नरोडे अहमदनगर
https://youtu.be/Bhan4-3z1C8
8) लक्ष्मण वाघ. अकलूज सोलापूर.
https://youtu.be/IiyKN3IuJJI
9) कृष्णा कांबळे पंढरपूर, सोलापूर.
https://youtu.be/TVWWTHhPCG4
10) विक्रम स्वामी  वैराग, सोलापूर.
https://youtu.be/eIZq6qEqrvY
 सतीश कोळपे सर लिखित भटकंती एक्सप्रेस हे पुस्तक मिळवाण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा. 
1. शंकर शिंदे, अकलूज, सोलापूर  9423039683
2. सतीश कोळपे, दौंड, पुणे,
9823426647
3. डॉ. दीपक ढोक, उमरखेड, यवतमाळ 7588188045
4.शिवशंकर राऊत वाशी,  उस्मानाबाद 9403705825
5. स्वप्नीलकुमार चव्हाण, सातारा  9763976897
प्रायोजक:- सतीश कोळपे, लेखक, भटकंती एक्सप्रेस.
आयोजक:- परिस प्रकाशन व भटकंती एक्सप्रेस परिवार.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙
राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा 2020
परिस प्रकाशन आणि भटकंती एक्सप्रेस आयोजित राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेतील अंतिम फेरीतील काही फोटो youtube वर अपलोड  करण्यात आले आहेत. सर्व बांधवाना नम्र विनंती आहे की सर्व फोटो पाहून like आणि कमेंट करा. तसेच भटकंती एक्सप्रेस  चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भटकंती एक्सप्रेस फेसबुक पेजला देखील करा.
फोटोग्राफी स्पर्धेतील काही फोटोंच्या लिंक खालीलप्रमाणे आहेत.
1) आनंद बोरा, नाशिक 
https://youtu.be/SOROYEf3SfQ
2) दादासाहेब बाबर, कराड
https://youtu.be/aE1avB9qzpI
3) गुंजन क्षीरसागर अमळनेर, जळगाव
https://youtu.be/6OZV8N7qNio
4) हंसराज देसाई, नाशिक
https://youtu.be/Jg8RRDAcrnw
5) सचिन घोडके वैराग, सोलापूर.
https://youtu.be/Lz62diD6HD8
 सतीश कोळपे सर लिखित भटकंती एक्सप्रेस हे पुस्तक मिळवाण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा. 
1. शंकर शिंदे, अकलूज, सोलापूर  9423039683
2. सतीश कोळपे, दौंड, पुणे,
9823426647
3. डॉ. दीपक ढोक, उमरखेड, यवतमाळ 7588188045
4.शिवशंकर राऊत वाशी,  उस्मानाबाद 9403705825
5. स्वप्नीलकुमार चव्हाण, सातारा  9763976897
प्रायोजक:- सतीश कोळपे, लेखक, भटकंती एक्सप्रेस.
आयोजक:- परिस प्रकाशन व भटकंती एक्सप्रेस परिवार.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

दिव, दमण, सिल्व्हासा ही नावं आपण लहानपणीच भूगोलाच्या पुस्तकात वाचली आहेत. तरी देखील ती ठिकाणं केंद्रशासित प्रदेश असल्याने त्यांच्याविषयी आपल्याला कुतूहल नेहमीच असतं. 
आज आपण दमण मधील निसर्ग सौंदर्य पाहूया. संजाण पासून दमण केवळ 24 किमी अंतरावर आहे. येताना वाटेत नारगोळचा सुंदर समुद्र किनारा आहे. परंतु दमण ला येण्याचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवेवरून वापी याठिकाणावरून दमणला जाता येते. दमण चे दोन भाग पडतात एक म्हणजे मोटी दमण आणि दुसरा नानी दमण. दमणला जामपोर समुद्र किनारा आहे. किनाऱ्यावर असलेल्या झाडीमुळे किनाऱ्याचे सौंदर्य खुलून दिसते. इथून सूर्यास्ताचे सिनेमॅटिक फोटो खूपच सुंदर निघतात म्हणून बरेच फोटोग्राफर सूर्यास्त कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी इथं येतात. मोटी दमणला एक किल्ला आहे त्याचे नाव फोर्ट ऑफ मोटी दमण असं आहे. दमणवर पोर्तुगीजांची सत्ता होती त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामावर पोर्तुगीज शैलीची छाप आढळते.
नानी दमणला देखील सेंट जोरेम फोर्ट आहे. तसेच इथला देवका हा समुद्र किनारा प्रसिद्ध आहे पण खडकाळ असल्याने पोहण्यासाठी योग्य नाही. पण अनेक चर्चेस, रेस्टॉरंट, लाईटहाऊस ही पाहण्यायोग्य ठिकाणे आहेत.
इथलं सत्यसागर उद्यान देखील सुंदर आहे. इथं गोव्यासारखं सौंदर्य बघायला मिळते पण ते गोव्यासारखं वर्दळीचा भाग बनलेला नाही तर अजूनही हे निसर्ग सौंदर्य अनटच आहे तसेच गोव्यासारखंच इथेही देशी विदेशी मद्य अतिशय स्वस्त दरात मिळते म्हणून इथं मद्याची मोठमोठी दुकाने पहायला मिळतात. अशा प्रकारच्या गोव्याची आठवण करून देणाऱ्या ठिकाणाला भेट द्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

 अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


फोटो साभार:- Google Map

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या इतर पोस्ट वाचण्यासाठी माझ्या भटकंती एक्सप्रेस या ब्लॉगला नक्की भेट द्या. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://bhatkantiexpress.blogspot.com 


https://youtu.be/eDA93zhL0NE

अलीकडेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवराष्ट्र ट्रेकर्स, भटकंती एक्सप्रेस यांच्या सहकार्याने  चांदोली अभयारण्याला भेट देण्याचा योगआला होता तेव्हा सातारा जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शाळा भेट देण्याचा योग शिवराष्ट्र ट्रेकर्सचे श्री. प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली आला. ते याच ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्यासोबत बनवलेल्या व्हिडीओची ही झलक पहायला विसरू नका.
आणि भटकंती एक्सप्रेस चॅनेलला सबस्क्राईब केले नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा. 
क्रमशः
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥙🥙🥙🥙🥙🥗🥗🥗🥗🥗🥗

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

संजाण हे केवळ मेमोरियल पिलर ऑफ संजाण यासाठीच प्रसिद्ध आहे असे नाही तर इथली दुसरीही एक गोष्ट  खूपच प्रसिद्ध आहे पण तरीही ती आडवाटेवरची बरं का!

ती गोष्ट म्हणजे आंबा. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष, हापूस आंबा हा  आंब्याचा राजा हे सगळ्या जगाला माहिती आहे पण चालतो आंबो हे माहित आहे का?
लिहिण्यात काहीही चूक नाही, चालता आंबा the walking mango tree. संजाण मधील हा चालतो आंबा खूपच प्रसिद्ध आहे. साधारणपणे 1200 ते 1500 वर्षांचे असलेले हे आंब्याचे झाड वर्षाला एक यार्ड या वेगाने चालत आहे. गेल्या 35 - 40 वर्षांत झाड बरेच अंतर चाललं आहे असं स्थानिक सांगतात. 
 हे झाड कसं चालतं? 
तर कमानीसारख्या फांद्या असलेल्या या झाडाच्या फांद्या उंच न वाढता जमिनीलगत वाढतात व काही अंतरावर जमिनीत वडाच्या प…
[७:४५ म.पू., १७/८/२०२०] shankarsambhushinde: 🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

संजाण हे केवळ मेमोरियल पिलर ऑफ संजाण यासाठीच प्रसिद्ध आहे असे नाही तर इथली दुसरीही एक गोष्ट  खूपच प्रसिद्ध आहे पण तरीही ती आडवाटेवरची बरं का!

ती गोष्ट म्हणजे आंबा. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष, हापूस आंबा हा  आंब्याचा राजा हे सगळ्या जगाला माहिती आहे पण चालतो आंबो हे माहित आहे का?
लिहिण्यात काहीही चूक नाही, चालता आंबा the walking mango tree. संजाण मधील हा चालतो आंबा खूपच प्रसिद्ध आहे. साधारणपणे 1200 ते 1500 वर्षांचे असलेले हे आंब्याचे झाड वर्षाला एक यार्ड या वेगाने चालत आहे. गेल्या 35 - 40 वर्षांत झाड बरेच अंतर चाललं आहे असं स्थानिक सांगतात. 
 हे झाड कसं चालतं? 
तर कमानीसारख्या फांद्या असलेल्या या झाडाच्या फांद्या उंच न वाढता जमिनीलगत वाढतात व काही अंतरावर जमिनीत वडाच्या प…
[१०:५५ म.पू., १७/८/२०२०] shankarsambhushinde: 🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

दिव, दमण, सिल्व्हासा ही नावं आपण लहानपणीच भूगोलाच्या पुस्तकात वाचली आहेत. तरी देखील ती ठिकाणं केंद्रशासित प्रदेश असल्याने त्यांच्याविषयी आपल्याला कुतूहल नेहमीच असतं. 
आज आपण दमण मधील निसर्ग सौंदर्य पाहूया. संजाण पासून दमण केवळ 24 किमी अंतरावर आहे. येताना वाटेत नारगोळचा सुंदर समुद्र किनारा आहे. परंतु दमण ला येण्याचा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवेवरून वापी याठिकाणावरून दमणला जाता येते. दमण चे दोन भाग पडतात एक म्हणजे मोटी दमण आणि दुसरा नानी दमण. दमणला जामपोर समुद्र किनारा आहे. किनाऱ्यावर असलेल्या झाडीमुळे किनाऱ्याचे सौंदर्य खुलून दिसते. इथून सूर्यास्ताचे सिनेमॅटिक फोटो खूपच सुंदर निघतात म्हणून बरेच फोटोग्राफर सूर्यास्त कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी इथं येतात. मोटी दमणला एक किल्ला आहे त्याचे नाव फोर्ट ऑफ मोटी दमण असं आहे. दमणवर पोर्तुगीजांची सत्ता होती त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामावर पोर्तुगीज शैलीची छाप आढळते.
नानी दमणला देखील सेंट जोरेम फोर्ट आहे. तसेच इथला देवका हा समुद्र किनारा प्रसिद्ध आहे पण खडकाळ असल्याने पोहण्यासाठी योग्य नाही. पण अनेक चर्चेस, रेस्टॉरंट, लाईटहाऊस ही पाहण्यायोग्य ठिकाणे आहेत.
इथलं सत्यसागर उद्यान देखील सुंदर आहे. इथं गोव्यासारखं सौंदर्य बघायला मिळते पण ते गोव्यासारखं वर्दळीचा भाग बनलेला नाही तर अजूनही हे निसर्ग सौंदर्य अनटच आहे तसेच गोव्यासारखंच इथेही देशी विदेशी मद्य अतिशय स्वस्त दरात मिळते म्हणून इथं मद्याची मोठमोठी दुकाने पहायला मिळतात. अशा प्रकारच्या गोव्याची आठवण करून देणाऱ्या ठिकाणाला भेट द्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

 अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


फोटो साभार:- Google Map

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या इतर पोस्ट वाचण्यासाठी माझ्या भटकंती एक्सप्रेस या ब्लॉगला नक्की भेट द्या. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://bhatkantiexpress.blogspot.com 



क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

 🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

संजाण हे केवळ मेमोरियल पिलर ऑफ संजाण यासाठीच प्रसिद्ध आहे असे नाही तर इथली दुसरीही एक गोष्ट  खूपच प्रसिद्ध आहे पण तरीही ती आडवाटेवरची बरं का!

ती गोष्ट म्हणजे आंबा. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष, हापूस आंबा हा  आंब्याचा राजा हे सगळ्या जगाला माहिती आहे पण चालतो आंबो हे माहित आहे का?
लिहिण्यात काहीही चूक नाही, चालता आंबा the walking mango tree. संजाण मधील हा चालतो आंबा खूपच प्रसिद्ध आहे. साधारणपणे 1200 ते 1500 वर्षांचे असलेले हे आंब्याचे झाड वर्षाला एक यार्ड या वेगाने चालत आहे. गेल्या 35 - 40 वर्षांत झाड बरेच अंतर चाललं आहे असं स्थानिक सांगतात. 
 हे झाड कसं चालतं? 
तर कमानीसारख्या फांद्या असलेल्या या झाडाच्या फांद्या उंच न वाढता जमिनीलगत वाढतात व काही अंतरावर जमिनीत वडाच्या पारंब्यासारख्या रुजतात. त्यानंतर आधीचे खोड वाळून कुजून जाते आणि नष्ट होते. पुढे काही वर्षांनी फांद्या पुढील बाजूस जमिनीत रुजतात असे हे चालणारे झाड सुरवातीपासून दोन तीन किलोमीटर अंतर चालले आहे.
इतकंच नाही तर हे झाड औषधी गुणधर्म असलेले आहे. लहान मुलांच्या पोटात दुखत असेल तर फांदीचा गर उगाळून दिल्यास आराम पडतो. तसेच मुकामार लागलेल्या ठिकाणी फांदी लावल्यास आराम पडतो. असे स्थानिक सांगतात. या आंब्याची चव फारसी वेगळी नाही पण हा आंबा पिकला की दोन तीन दिवसांत खराब होतो. 
गुजरात राज्यातील उच्चपदस्थ वनाधिकाऱ्यांनी या आंब्याच्या  फांद्यापासून कलमे विकसित करण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नाही. तीनशे चारशे आंब्याच्या कलमापैकी एकही कलम फुटले नाही असेही स्थानिक सांगतात. असे हे चालणारे आंब्याचे झाड चालतो आंबो बघायला हवं ना!!

 अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


फोटो साभार:- चालतो आंबो फेसबुकपेज

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

माझ्या इतर पोस्ट वाचण्यासाठी माझ्या भटकंती एक्सप्रेस या ब्लॉगला नक्की भेट द्या. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://bhatkantiexpress.blogspot.com 

मित्रहो,
नमस्कार. 74 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भटकंती एक्सप्रेस परिवारांमार्फत चॅनेलची निर्मिती केली आहे.तरी भटकंती एक्सप्रेस हे you tube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.

भैरवगडावर मित्रांनी केलेला जल्लोष गो कोरोना गो
https://youtu.be/r5NzFYfqkkQ

चांदोली अभयारण्यात असलेल्या भैरवगगडाची सफर 

https://youtu.be/hFnPkc4mihs

चांदोली अभयारण्यात असलेल्या भैरवगगडाची सफर 
https://youtu.be/iMB_xIzUP7E

सोलापूर जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या सुळकाई ता. माळशिरस इथं केलेली पहिली सायकलस्वारी
https://youtu.be/cyjUmNH6fyI

व्हिडिओ आवडल्यास like, share आणि comment करायला विसरू नका.

क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙 
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙

निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं ठिकाण म्हणजे काय! हे जर अनुभवायचं असेल तर इथं यायलाच हवंय.अस्सल कोकणाचे वर्णन केलं आहे असे ठिकाण पहायचं असेल तर इथं येण्याशिवाय गत्यंतर नाही.  सगळा कोकण फिरून झालाय आता काय बघावं कोकणात! असं म्हणणाऱ्यानी  तर इथं आलंच पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली- हर्णे रोडवर  साधारणपणे सहा सात किलोमीटर अंतरावर आसूद नावाचं गाव आहे. तिथून जवळच दाबकेवाडी नावाचं पुस्तकात वर्णन केल्यासारखं गाव आहे. गावातून  पायवाटेने इथं यावं लागतं. आणि हो! आधी नाव सांगायचं राहिलंच की! केशवराज मंदिर. 

दाबके वाडीतून अगदी छोट्या पायवाटेने मंदिरापर्यंत काही पायऱ्या चढून वर जावे लागते. आकाशाशी स्पर्धा करणारी नारळाच्या आणि पोफळीच्या बागा, अत्यंत घनदाट जंगल.  त्यातच करवंदे तसेच कोकणच्या रानमेवा असलेली झाडे झुडपे. छोटी पायवाट चालून गेल्यावर चढण लागण्यापूर्वी छोट्या नदीवरील सांकव पार करून जावे लागते. पूर्वी तो सांकव लाकडाचा होता. पण आता गावकऱ्यांनी पक्का पूल तयार केला आहे. पूल पार केला की  अर्ध्या तासाच्या चढाईने आपण मंदिराच्या परिसरात पोहोचतो. इथली झाडी पाहून अमेझॉन खोऱ्यातील दाट जंगलाची आठवण झाली नाही तरच नवल. 
मंदिराच्या समोर थोडे मोकळं पटांगण आहे. मंदिर अत्यंत साध्या पद्धतीचे आहे. लाकडी खण किंवा माळवद असलेले छप्पर आहे. मंदिर परिसर तसा मोठा आहे. त्याच परिसरात उंच डोंगरावर उगम पावणाऱ्या झऱ्याचे पाणी दगडी नळ्याच्या साह्याने मंदिराच्या समोरच गोमुख बांधून आणलेले आहे. त्या गोमुखातून वर्षभर पाणी वाहत असते. त्यातील पाण्याची चव अगदी अमृतासमान आहे. त्या पाण्याने हात पाय धुवून चेहऱ्यावर पाणी मारलं की सगळा शीण कुठल्या कुठे पळून जातो. 
मग मंदिरातील केशवराजचे दर्शन घेतले की मन एकदम प्रसन्न होऊन जाते. मंदिरात येण्यासाठी दुसरा एक मोटारसायकल जाण्याइतकाच मार्ग आहे. आणि ती अत्यंत अवघड आहे आणि दूरचा मार्ग आहे. त्या मार्गाने केवळ मोटारसायकल जाऊ शकते पण पायऱ्या चढून गेल्यानेच मंदिरात गेल्याचा आनंद मिळतो. सभोवताली निरव शांतता, आणि ती शांतता भंग करण्याचा लटका प्रयत्न करत असलेले गोमुखातून वाहणारे पाणी, घनदाट जंगल,  आकाशात घुसलेल्या झाडांच्या फांद्यामुळे सुर्यप्रकाश देखील जमिनीवर पडायची पंचाईत. या ठिकाणी आल्यानंतर इथून पाय निघतच नाही. अनेक ब्राह्मण मंडळींचे हे कुलदैवत असल्याचे सांगितले जाते. विष्णूचा अवतार असलेले हे नितांतसुंदर केशवराज मंदिर आवर्जून पहायलाच हवं.


 अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.


फोटो ठिकाण:- केशवराज मंदिर

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

चांदोली अभयारण्य

🥗🥗 भटकंती एक्सप्रेस🥙🥙
🚩🚩 गूढरम्य-महाराष्ट्र 🚩🚩
🥙 आडवाटेवरची ठिकाणं 🥙
🥗🥗 चांदोली अभयारण्य 🥙🥙

सातारा, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यातील 300 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळावर  चांदोली अभयारण्य आहे. हे राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे. त्यामुळे या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत आहे. या राष्ट्रीय उद्यानाची प्राणिगणना २०१० साली, मे महिन्यात दोन टप्प्यांत करण्यात आली. संपूर्ण अभयारण्याची १२ खंडांत विभागणी केली आहे. प्राणिगणनेसाठी प्रत्येक खंडात एक गट याप्रमाणे प्राण्यांचे पाणस्थळ व पायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी केली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाते. त्यानुसार सर्वांचे अहवाल एकत्रित करून राष्ट्रीय उद्यान प्रशासन तात्पुरती प्राण्यांची आकडेवारी निश्‍चित करते. वाघ, बिबटे यांचे ठसे नागपूर येथील मुख्य कार्यालयात जमा केले जातात. त्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच आकडेवारी निश्‍चित केली जाते. ठशांवरूनच कोणता प्राणी (वाघ की बिबट्या) नर, मादी, पिल्लू, त्यांचे वय यांची निश्‍चिती केली जाते. तुम्ही कधी चांदोली अभयारण्यात गेला आहात का? मला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का!
चांदोली अभयारण्यात वाघ, बिबटे,भेकर, रानगवा,सांबर, रानकुत्रे, अस्वल, मोर अनेक प्रकारचे साप,घोरपड असे अनेक प्राणी आढळतात. अभयारण्यात सदाहरित, निमसदाहरित, पानझडी इत्यादी प्रकारचे वृक्ष आढळतात. ज्यात जांभूळ, बांबू,आंबा,अंजनी, हिरडा, आवळा, वेत, करवंद, कारवी यांचा समावेश आहे.
अभयारण्यात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
एकमार्ग आहे वारणा नदीवरील चांदोली धरणाजवळील वारणावती इथून आणि दुसरा मार्ग आहे कराड पाटण नवीन पुलावरून. चांदोली अभयारण्यात प्रचितगड व भैरवगड हे किल्ले आहेत. नाव, कळे, कोळणे, पाथरपुंज ही अतिशय दुर्गम गावं आहेत. या गावांमध्ये कोणत्याही मोबाईलला रेंज नसते. वाहनांची कसलीही सोय  नसते. अभयारण्य परिसर असल्याने इथं रस्तेही सगळे कच्चे आहेत. सगळा प्रवास धुळीतून करावा लागतो. पण निसर्गाच्या सानिध्यात जायचं म्हणल्यावर तर इतकं असणारच.  पाथरपुंजच्या पुढे भैरवगड आहे. शिवराष्ट्र ट्रेकर्स साताराचे ट्रेकर्स प्रदीप सावंत यांची कोळणे ही शाळा. प्रदीप सावंत आणि स्वप्नील चव्हाण यांच्यामुळंच  मला चांदोली अभयारण्य आणि भैरवगड  पहायचा योग आला. तो अनुभव खूपच सुंदर होता. ऐन पावसाळ्यात एकदा चांदोली अभयारण्यात जायची मनापासून इच्छा आहे. बघू कधी शक्य होते ते!!!!
फोटो ठिकाण:-  सातारा जिल्ह्यातील सर्वात दुर्गम शाळा जि.प.प्राथ.शाळा कोळणे.
सदरच्या पोस्टमध्ये एक सिक्रेट प्रश्न तुम्हाला विचारला आहे त्याचे उत्तर द्यायला विसरू नका बरं!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

क्रमशः
शब्दांकन
शंकर शिंदे
भटकंती एक्सप्रेस
🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙🥙

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

21

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस चौथा🏞🛣🌄
🌿🌿 *भाग एकवीस*🌿🌿
                    चार दिवसांच्या प्रवासानंतर वैरागजवळ आलो असता संपूर्ण वैराग मध्ये आतिषबाजी सुरु होती फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते रात्रीच्या आकाशात होणाऱ्या या आतिषबाजीने सारे आकाश उजळून निघाले होते जणू माझ्या आगमनाचे स्वागत करण्यात येत होते दिवाळीचा सण साजरा करण्यात येत होता परंतु माझे कशाकडेही लक्ष नव्हते घराची ओढ लागली होती अखेर चार दिवसातील 1055 किमीच्या प्रवासानंतर सायंकाळच्या साडे सात वाजता घरी आलो गाडीवरून उतरताना मन भरून आले होते आणि उगीचच महाभारताच्या लढाईची आठवण झाली मी गाडीचे आभार मानले अगदी मनापासून ती निर्जीव अन यंत्र असली तरी कारण एखाद्या जिवलग मित्राप्रमाने जशी गेली दोन वर्षे साथ दिली तशीच साथ गेल्या चार दिवसांत दिली होती कसलाही त्रास न देता, अगदी हवाही चेक करण्याची गरज लागली नव्हती, घरात आल्यावर सौ ने औक्षण केले आणि मला मी एखाद्या लढाईवरून आल्यासारखे वाटलं, घरी आल्यावर पहिले काम मी जर कोणते केले असेल तर फ्रेश होऊन एक msg तयार करून whats app वर पोस्ट केला कारण मला माहित आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची कमी नाही  पण निलेश शिंदेला माझ्या लक्षात असूनही फोन केला नाही परत करू, परत करू असे करता करता  राहून गेले आणि दुसऱ्या दिवशी अकरा वाजता परत निलेशचा फोन आला आणि माझीच मला लाज वाटली कारण माझा फोन आला नाही म्हणून त्याने फोन केला होता अशा जिवलग मित्रांचे आभार मानले तर मैत्रीचा उपमर्द ठरेल म्हणून मी त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करतो
               प्रवास संपल्यावर कंटाळा येतो पण मला असे वाटलेच नाही उलट मला उत्साह मिळाला आनंद झाला कधीकधी प्रवासाच्या  मानसिक अवस्थेचा जर विचार केला तर प्रवास हाच त्रास दायक ठरतो तोच नकोसा वाटतो माहेरवाशिणीला माहेरहून निघताना गहिवरून येते आणि संपूर्ण प्रवासात गहिवर राहतो पण सासरी आल्यावर मात्र ती परत त्या घराशी एकरूप होऊन जाते अशी अवस्था मी अनुभवली आहे कैकवेळा  जेंव्हा मी नवीन नोकरीला लागलो होतो तेव्हा हिंगोलीहून येताना कधी गावाकडे पोहोचतो असे व्हायचे पण गावाकडून जाताना मात्र माहेरवाशिणीसारखे व्हायचे संपूर्ण प्रवास जीवावर यायचा, नकोसा वाटायचा  पण एकदा तिथे गेल्यावर मात्र परत येईपर्यंत गावाकडची आठवण व्हायची नाही 
                    प्रवासवर्णन  करत असताना काही ठिकाणी वेळ व  अंतर  लिहिलेले असून ते फक्त आपल्या माहिती साठी असून अंदाजे आहे मी जो प्रवास चार दिवसात केला आहे तो खरं तर कमीत कमी 8 दिवसांचा नक्की आहे मी फार गडबडीत पूर्ण केला याची मला जाणीव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोबतीला कुणीतरी हवेच आपले हक्काचे माणूस नाहीतर जो आनंद आपण एकटेच अनुभवतो  तो असुरीच ठरेल, नाही का?
                   पाटेश्वराच्या डोंगरावरून जड अंतःकरणाने उतरताना झालेली घालमेल अन सज्जनगडावरून उतरताना आलेले वैराग्य कसे विसरणार, लिंगमळा धबधबा पहायला जातांना चार माकडांना पाहून मनात वाटलेली भीती वेण्णा नदीचे खोरे क्षितिजापर्यंत पाहताना छाती दडपून जाते की काय या विचाराने पाणी पाणी झालेले मन इको पॉइंटवर असताना झालेली एकटेपणाची जाणीव काळभैरव मंदिरात जाताना आलेली चीड प्रतापगडावरून जावळीचे खोरे पाहताना भरून आलेली छाती, पालगडला सानेगुरुजींच्या आठवणीने कासावीस झालेले मन , मुरुडचा समुद्र किनारा पाहून एक जिवलग मित्र भेटल्याची भावना, रायगडावर तुमचं आमचं नातं काय ? या जयघोषानंतर अंगावर आलेले रोमांच, पहाटेच्या गडवाऱ्यात आणि रायगडावरील सूर्योदय पाहताना परत कधी असा योग्य येईल या विचाराने कातर झालेले मन, असे  एक ना अनेक प्रसंग मनात घर करून बसले आहेत आणि त्या वरही पुरून उरला तो म्हणजे एकट्यानं एवढा प्रवास करण्याचा बेधुंद अनुभव, खरंच एकट्यानं प्रवास करण्यातही एक मजा आहे एक धुंदी आहे एक मस्ती आहे एक आनंद आहे तो अनुभवण्यासाठी आपणही कधीतरी एकट्याने प्रवास करावाच यापुढंही असा प्रवास करायला खूपच आवडेल नक्कीच पण कधी योग येईल काय माहित? असा योग आल्यास नक्की प्रवास करणारच आपल्यापैकी जर कोणाला करायची आवड असल्यास आपणही प्रवास करावा हि विनंती आणि तो प्रवास माझ्याबरोबर असेल तर सोने पे सुहागाच!
                      आज माझ्या *बाईकसवारी:-एक प्रवास* या प्रवास वर्णन लेखनाचा शेवटचा भाग आहे लेखनसमाप्ती करताना अतिव दुःख होतं आहे मन भरून आलं आहे एखादी सुंदर कलाकृती पूर्ण केल्यावर कलाकाराला जो अनुभव येत असेल तोच अनुभव मी घेत आहे, तो आनंद आणि ते मानसिक समाधानही मी यावेळी अनुभवतो आहे सुखदुःखाच्या ऊनपावसाचा अनुभव मला आता येतोय अन मला कृतार्थ झाल्यासारखे वाटत आहे प्रवास वर्णन  लेखन करणे हा हेतू नव्हताच मुळी पण लक्ष्मण वाघमारे गुरुजीसारख्या जेष्ठ मित्रांच्या आग्रहामुळे हा अक्षरयज्ञ मी आरंभिला, प्रत्येक शब्दाची समिधा या यज्ञात अर्पण करताना मन भरून येत आहे पण त्याच बरोबर परत एकदा वाचकांच्यासह  सहल केल्याचा आनंद अनुभवायला मिळाला याबद्दल माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांचे त्रिवार आभार व्यक्त करण्यापेक्षा ऋणात राहणेच मी पसंत करीन. 
                आज लेखन करताना हात अन हृदय दोन्ही जड झालेलं आहे शब्द सुचत नाहीत  यावेळी ज्यांच्या आठवणीने माझे डोळे भरून  आले आहेत ते माझे परममित्र मार्गदर्शक अन निखळ मनाचा माणूस शिवशंकर  साखरे गुरुजी, संपूर्ण प्रवासात माझी फोन करून विचारणा करणारा आदिल सय्यद सर , राजेंद्र आवारे गुरुजी अध्यक्ष शिक्षक संघ वैराग,आनंद पिंपळे सर (करमाळा), दीपक शेळके,  गु.ना कल्याणी, (ज्याचे हेल्मेट घेऊन मी हा प्रवास पूर्ण केला )बा रा पाटील गुरुजी  सतिश ढेकळे गुरूजी महावीर तुपसमिंदर सर (सातारा) भोसले सर (सातारा)महाबळेश्वरचा प्रवास ज्यांच्यामुळे कमी वेळात पूर्ण झाला ते चव्हाण सर (सातारा) , विनायक शिंदे सर ( महाड ) निलेश शिंदे (रहाता) तसेच सर्व मित्र हितचिंतक वाचकांचे व  प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मित्रांचे ऋण डोक्यावर घेऊन नाचताना आनंद होतो आहे
               माझ्या लेखनाचे कौतुक करणारे बब्रूवाहन काशीद गुरुजी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक संघ शाखा सोलापूर ,आमची प्रत्यक्ष ओळख नसतानाही संपूर्ण प्रवासात माझी विचारपूस करणारे तसेच माझ्या प्रत्येक भागाच्या  लेखनाचे कौतुक करणारे शिक्षक नेते जोतिराम बोंगे गुरुजी (पंढरपूर) तुमची कौतुकाची थाप माझे मनोबल वाढविणारी ठरते प्रत्येक वेळी!
                   प्रवास वर्णनाचे लेखन करतेवेळी माझ्या लेखनाला इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही नव्हती. सोशल मीडियावर दररोज अंदाजे 12 ते 13 हजार मित्रांपर्यंत माझे लेखन पोहोचत आहे, या प्रवास वर्णनाच्या लेखनाने मला काय मिळालं तर अनेक मित्र केवळ या लेखनाच्या माध्यमातून मिळाले शेकडो मित्रांनी माझ्या लेखनाचे समक्ष, सोशल मीडियावर, फोन करून कौतुक केलं, अनेकांनी प्रवास समक्ष अनुभवत असल्याचे सांगितले याहीपेक्षा मला मिळालेलं आत्मिक समाधान खूप मोठं आहे परत एकदा माझ्यावर प्रेम करणाऱ्या , मला लेखन करायला लावणाऱ्या , माझं लेखन वाचणाऱ्या, माझं कौतुक करणाऱ्या  आणि प्रत्यक्ष प्रवास करताना मला मदत करणाऱ्या ज्ञात-अज्ञात मित्रांचे ऋण व्यक्त करतो 
           जीवनाच्या मागे धावपळ करत असताना वेळ मिळाला तर असा प्रवास करायला नक्कीच आवडेल या लेखमालेचे वाचन करणारा एखादा वाचक जर पुढच्या प्रवासात सोबती मिळाला तर यापेक्षा आनंद तो दुसरा कोणता असेल? पाणावलेल्या पापण्यांच्या कडा आणि भरून आलेलं मन यासह तात्पुरता आपला निरोप घेऊन लेखनाची सांगता करतो 
नमस्कार!!!!!🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
     परत भेटू लवकरच नव्या प्रवास वर्णना सह
*ता क*:-ज्या वाचक मित्रानी पहिल्या भागापासून वाचन केले नाही त्या वाचकांना तर माझा प्रवास सुरू आहे असे वाटते असे बरेच संदेश, फोन मला आले  या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो की सदरचा प्रवास मी 27 ते 30 ऑक्टो.2016 या काळात केलेला आहे. प्रवास करताना माझे लेखन उपयुक्त ठरले तरच या लेखनाचे यश आहे माझ्या *बाईकसवारी:-एक प्रवास* या लेखमालेच्या मागच्या सर्व भागांचे pdf रूपांतर केले आहे ते download करण्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून download करून घ्यावे
https://goo.gl/n8ncCL

लेखनसीमा
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
मागील सर्व भागांचे pdf download करण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/n8ncCL
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये